५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:35 IST2025-07-16T12:35:02+5:302025-07-16T12:35:24+5:30
Crime Delhi : ही महिला गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती.

५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
एकीकडे नात्यांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत, तर त्यातून गुन्हेही घडत आहेत. आता एका अशाच धक्कादायक घटनेत, पाच मुलांची आई असलेल्या विवाहित महिलेची तिच्या अविवाहित प्रियकरासोबतच्या भांडणात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, त्यात प्रेम, विश्वासघात आणि एका कुटुंबाच्या विनाशाची करुण कहाणी दडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बदायूं जिल्ह्यातील सतीश हे त्यांची पत्नी नीरज आणि पाच मुलांसह मामुरा गावात एका भाड्याच्या घरात राहत होते. सतीश एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी नीरज गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती. अर्जुन सेक्टर-५९ येथील एका खाजगी कंपनीत हाऊस कीपिंगचे काम करतो. सतीश यांना नीरज आणि अर्जुन यांच्यात केवळ बोलचाल असल्याची माहिती होती.
कशावरून सुरू झाला वाद?
सोमवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता नीरज अर्जुनला भेटायला त्याच्या खोलीत गेली होती. तिथे त्यांच्यात संबंध तोडण्यावरून वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर अर्जुनने नीरजला मारहाण केली. या मारहाणीत नीरज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. अर्जुन घाबरला आणि त्याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथून तिला कैलास रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रियकर अर्जुनला ताब्यात घेतले. नीरजच्या कुटुंबीयांनी अर्जुनने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे.
१३ वर्षांपूर्वी झाले होते लग्न, पाच मुलांची होती आई!
पोलिसांनी सांगितले की, नीरजचे लग्न १३ वर्षांपूर्वी सतीशसोबत झाले होते. त्यांना पाच मुले आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतीश पाच वर्षांपूर्वी मूळ गावाहून नीरजला घेऊन नोएडाला आले होते. इथे राहत असताना त्यांची ओळख शेजारी राहणाऱ्या अर्जुनशी झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. अर्जुन अविवाहित असून त्याचे वय २४ वर्षे आहे.
या घटनेमुळे नीरजच्या पाच मुलांचे आणि पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.