संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:08 IST2020-12-12T00:08:21+5:302020-12-12T00:08:54+5:30
Crime News : कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद
ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करून डोक्यावर हल्ला करून, त्यांच्या खुनाचा प्रयत्नातील सूत्रधार संतोष रमेश ढवळे उर्फ मायकल (४८, रा. डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरमधील श्रीराम चौकातील एका बारमधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर, ते त्या ठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याच वेळी एका कारमधून आलेल्या हितेश ठाकूर (२३) आणि सागर शिंदे (२३) या दोघांनी गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून, गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात ते गंभीर जखमी झाले. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने २४ ऑक्टोबर रोजी हितेश आणि सागर या दोघांना नाशिक येथून अटक केली. त्यानंतर, २९ ऑक्टोंबर रोजी त्यांचा तिसरा साथीदार शाहरुख शेख यालाही अटक केली. यातील सूत्रधार मायकल हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यालाही कोथमिरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने उल्हासनगर येथून १० डिसेंबर रोजी अटक केली.
मायकल याने आपली अटक वाचविण्यासाठी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अखेर ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली. या अटकेनंतर या हल्ल्यामागील नेमका उद्देश स्पष्ट हाेण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे.