पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीनं रचला हत्येचा कट; ७२ तासांत पोलिसांनी उलगडला खुनाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:46 IST2026-03-30T18:46:06+5:302026-03-30T18:46:24+5:30
तपासादरम्यान हा हत्येचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी रात्री उशिरा हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीनं रचला हत्येचा कट; ७२ तासांत पोलिसांनी उलगडला खुनाचा गुन्हा
मंगेश कराळे
नालासोपारा - अनोळखी महिला मृतदेहाची ओळख पटवुन युपीवरून नालासोपाऱ्यात आणून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या पतीला त्याच्या मित्रासह अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे. ७२ तासांत ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने मित्रासोबत केलेला हत्येचा कट उधळून लावल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे.
शिरसाड-वज्रेश्वरी मार्गालगत असलेल्या रमेश घरत यांच्या शेतात, जांभळाच्या झाडाशेजारी एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिकांना आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने धाव घेतली होती. मृत महिलेने अंगात गुलाबी रंगाचा फुलांची नक्षी असलेला टॉप आणि पिवळसर रंगाची लेगीज परिधान केलेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, २१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने कोणत्याही कारणावरून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून खून केला असावा. सुरुवातीला मांडवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान हा हत्येचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याने रविवारी रात्री उशिरा हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ३ यांचेकडून समांतर तपास करून अनोळखी मयत महिलेची ओळख पटविणे व आरोपीचा शोध घेण्यात येत होता. परंतु मयत महिलेचे प्रेत हे कुजलेल्या स्थितीत मिळून आल्याने ओळख पटविणे कठीण होते. तसेच मयत महिलेबाबत मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर जिल्हा व नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यातील तसेच उत्तरप्रदेश राज्यातील महिला मनुष्य मिसींगची माहिती घेवुन देखील काहीएक माहिती मिळत नव्हती.
गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न करुन सुमारे ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग ७२ तांसाचे फुटेज तपासुन व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपी रोशन रामजग यादव (२६) आणि भानुप्रताप विजय बहादुर यादव (३०) या दोघांना २८ मार्चला ताब्यात घेवुन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केल्यावर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून अनोळखी मयत महिलेची ओळख पटविण्यात आली. मयत महिलेचे नाव मधुबाला ऊर्फ प्रियाकुमारी रोशन यादव (२३) असे असून ती आरोपी रोशन यादव याची पत्नी आहे.
आरोपी रोशनने त्याचे पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने पत्नीचा खुन करण्याचे उद्देशाने तिला १५ मार्चला उत्तरप्रदेश येथुन नालासोपारा येथे आणले होते. त्यानंतर आरोपी रोशनने त्याची पत्नी मधुबाला ऊर्फ प्रियाकुमारी हिचा खुन करण्यासाठी त्याचा मित्र भानुप्रताप याच्यासह मिळुन खुनाचा कट रचला होता. त्यानुसार आरोपी रोशनने त्याचा मित्र भानुप्रतापच्या मदतीने मधुबालाला १९ मार्चला नालासोपारा येथून त्याचे दुचाकीने घटनास्थळी नेवून तिच्या मानेवर धारदार चाकूने वार केला व तिचे डोके दगडाने ठेचून तिला क्रूरपणे जीवे ठार मारले आहे.
उपरोक्त कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, सफौ शिवाजी पाटील, पोहवा मुकेश तटकरे, गोविंद केंद्रे, सागर बारावकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, इंद्रनिल पाटील, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, दत्तात्रय जाधव, मनोहर तारडे, आतिश पवार, तुषार दळवी, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनवणे तसेच सायबर विभागाचे सफौसंतोष चव्हाण यांनी केली आहे.