गर्लफ्रेंडला रंग लावल्याचा राग; मित्रांनीच केली मित्राची हत्या, जिवंत अवस्थेत रेल्वे रुळावर झोपवून पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:57 IST2026-03-17T17:44:25+5:302026-03-17T17:57:58+5:30
पानीपतमध्ये रेल्वे रुळांवर सापडलेल्या एका मृतदेहाबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला.

गर्लफ्रेंडला रंग लावल्याचा राग; मित्रांनीच केली मित्राची हत्या, जिवंत अवस्थेत रेल्वे रुळावर झोपवून पळाले
Haryana Crime: हरियाणातील पाणीपतमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला होळीचा रंग लावल्याचा राग मनात धरून, एका तरुणाने आपल्याच मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. आरोपींनी हत्या करून आरोपी थांबला नाही, तर हा खून नसून अपघात वाटावा यासाठी त्यांनी जखमी तरुणाला जिवंत अवस्थेत रेल्वे रुळावर झोपवले. अंगावरून ट्रेन गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत तरुणाचे नाव कालू (२३ वर्षे) असून, तो होळीच्या दिवसापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडल्याने सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा नियोजित खून असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी कालूच्याच गावातील संजू, राहुल आणि विशाल या तिघांना अटक केली आहे.
'ती'ला गुलाल लावला अन्...
पोलीस चौकशीत मुख्य आरोपी संजूने आपला गुन्हा मान्य केला आहे. संजूच्या सांगण्यानुसार, होळीच्या दिवशी कालूने संजूच्या एका महिलेला गुलाल लावला होता. ही गोष्ट संजूला सहन झाली नाही आणि त्याने कालूचा काटा काढण्याचे ठरवले. याशिवाय, जुन्या वादाचीही किनार याला होती. कालूने काही दिवसांपूर्वी संजूची मोटारसायकल नेली होती, जिचा अपघात झाला होता. मोटारसायकलचे नुकसान होऊनही कालूने भरपाई न दिल्याने संजू चिडून होता.
असा रचला मृत्यूचा सापळा
घटनेच्या दिवशी संजूने कालूला घराबाहेर बोलावले. तिन्ही आरोपींनी कालूला सोबत घेऊन दारूची पार्टी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतः कमी दारू प्यायली, पण कालूला जबरदस्तीने प्रचंड दारू पाजली. तो पूर्णपणे नशेत धुंद झाल्यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून रेल्वे रुळावर नेण्यात आले.
जिवंतपणी रेल्वे रुळावर झोपवले
रेल्वे रुळावर नेल्यानंतर संजूने कालूच्या मानेवर स्क्रू ड्रायव्हरने दोनदा वार केले. मात्र, तरीही कालूचा मृत्यू झाला नाही. तो जखमी अवस्थेत असतानाच, आरोपींनी त्याचे हात-पाय पकडले आणि त्याला रेल्वे रुळाच्या मधोमध जिवंत झोपवून तेथून पळ काढला. कालू नशेत आणि जखमी असल्याने त्याला हालचाल करता आली नाही. काही वेळातच भरधाव ट्रेन अंगावरून गेल्याने त्याचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले.
पोलिसांनी असा लावला छडा
सुरुवातीला हा रेल्वे अपघात वाटत होता, पण कालूच्या मोबाईलचे लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना संजूवर संशय आला. संजू आणि त्याचे साथीदार घटनेच्या वेळी रुळाच्या परिसरातच असल्याचे समोर आले. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला.