पत्नीची हत्या करून ९ तास मृतदेहापाशी बसून राहिला; स्वतः देखील संपवणार होता जीवन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:29 IST2026-03-23T09:28:25+5:302026-03-23T09:29:03+5:30
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती अरुण हा तब्बल ९ तास पत्नीच्या मृतदेहापाशीच बसून होता.

पत्नीची हत्या करून ९ तास मृतदेहापाशी बसून राहिला; स्वतः देखील संपवणार होता जीवन, पण...
चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील कैथल जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य इतके भीषण आहे की, आरोपी पती अरुण हा हत्येनंतर तब्बल ९ तास पत्नीच्या मृतदेहापाशीच बसून होता. त्याने आत्महत्या करण्यासाठी शेवटची चिठ्ठीही लिहून ठेवली होती, मात्र मृत्यूच्या भीतीने तो स्वत:चे आयुष्य संपवू शकला नाही. पोलिसांनी आता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रात्रीची 'ती' थरारक अडीच वाजताची वेळ
एसएचओ गीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री २ ते २:३० च्या सुमारास घडली. आरोपी अरुण दारूच्या नशेत घरी पोहोचला होता. त्यावेळी पत्नी शालू आणि तिची दोन निष्पाप मुले झोपले होते. मात्र, अरुणने घरात पाऊल ठेवताच वादावादी करायला सुरुवात केली. याच दरम्यान अरुणच्या डोक्यात हत्येचा विचार आला. त्याने झोपेतच शालूचा गळा दाबला. शालूने स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, ती तडफडली, पण अरुणने तिचे प्राण जाईपर्यंत गळा दाबणे सोडले नाही. विशेष म्हणजे, ज्या बेडवर ही हत्या झाली, त्याच बेडवर दोन्ही मुले गाढ झोपेत होती.
सुसाइड नोट तयार होती, पण मरणाची भीती वाटली
पत्नीच्या हत्येनंतर अरुणने स्वतःलाही संपवण्याची योजना आखली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाइड नोट जप्त केली आहे. यात त्याने लिहिले होते की, "मी पत्नीवर खूप प्रेम करतो, पण तिच्या चारित्र्यावरील संशय आणि तिचे वारंवार माहेरी जाणे यामुळे मी त्रस्त आहे. मी तिला मारून स्वतःही जीव देत आहे."
मात्र, हत्येनंतर ९ तास तो मृतदेहाशेजारीच बसून राहिला. कधी घराबाहेर तर कधी घरात चकरा मारत राहिला, पण आत्महत्येसाठी त्याचे मन धजावले नाही. सकाळी ११ वाजता जेव्हा त्याची नशा उतरली आणि मुले जागी होण्याची वेळ आली, तेव्हा त्याने आपल्या वहिनीला सांगितले, "मी शालूला मारून टाकले आहे, आता तुम्ही काय ते बघा," आणि तिथून पळ काढला.
सासूला फोन करून विचारले - "फोटो पाठवू का?"
पळून जाण्यापूर्वी अरुणने आपल्या सासूला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. जेव्हा सासूचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, तेव्हा तो संतापून म्हणाला, "तुमची मुलगी मेली आहे, विश्वास बसत नसेल तर फोटो पाठवू का?" यानंतर त्याने पत्नीचा मोबाईलही तोडून टाकला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मुलांचे भवितव्य
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, अरुण यापूर्वीही चोरीच्या एका गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आला होता आणि सध्या तो जामिनावर बाहेर होता. शालूच्या मृत्यूनंतर तिचे माहेरचे लोक पंजाबमधील भटिंडा येथून कैथलला पोहोचले. शवविच्छेदनानंतर त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भटिंडाला नेला. पोलिसांनी आरोपीला शीला खेडा ड्रेन जवळून अटक केली आहे.