रांची - झारखंडच्या गुमलामध्ये अंधश्रद्धेचा कहर म्हणावा अशी घटना घडली आहे. या परिसरातील ग्रामीण भागात चेटकीण वगैरे असल्याचा दावा करून मरहाण आणि हत्येच्या घटना दररोज घडत असतात. आता समोर आलेली घटना ही गुमला जिल्ह्यातील गम्हरिया गावातील आहे. येथे चेटकीण असल्याचा आरोप करत ४५ वर्षीय तेम्बो उरांव आणि रीना उरांव या महिलांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघांनाही वाचवले.
पीडित बिपैत उरांव यांनी सांगितले की, नातेवाईकांनी त्या चेटकिणी असल्याचे सांगत त्यांना मारहाण केली. त्यांनंतर तोंडावर चावा घेतला. तसेच हे मांस खाल्ले. त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. संपूर्ण प्रकरणाविरोधात पीडितेने घाघरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. ठाण्याचे प्रभारी अभिनव कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करून तपास केला जात आहे. आता या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही. चेटकीण ही एक अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारचे आरोप करून कुणालाही त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
जिल्ह्यामध्ये चेटकीण असल्याचा दावा करून छळ केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मारहाणीपासून हत्येपर्यंतच्या घटना घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये कारवाई होते. तर काही प्रकरणांची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचतही नाही. त्यामुळे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात लोक अडकलेले आहेत.