सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:45 IST2023-07-08T13:45:09+5:302023-07-08T13:45:39+5:30
बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या

सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. येथे ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज मतदानादिवशीची मोठ्या प्रमाणावर हिंसेचा आगडोंब उसळला असून, त्यात काही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मतपेट्या पळवण्याचाही प्रकार घडला. विशेष म्हणजे काही ठिकाणी मतपेट्या जाळल्या असून तलावातही फेकून देण्यात आल्या आहेत.
बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना आग लावून पेटवून देण्याचा सिनेस्टाईल थरात येथे पाहायला मिळाला. तर, काही बॅलेट बॉक्सची तोडफोड करुन त्यांना जवळील तलावातही फेकून देण्यात आलंय. या घटनेनंतर तेथील महिला अधिकाऱ्याला रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हे कृत्य केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, सीताई येथेही एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्या. या घटनेनंतर खूप वाद झाला.
#WATCHपश्चिम बंगाल पंचायत चुनाव के दौरान कूच बिहार ज़िले में दिनहाटा के बारानाचिना में एक मतदान केंद्र पर कथित तौर पर फर्जी मतदान से नाराज मतदाताओं ने मतपेटी में आग लगा दी। pic.twitter.com/LGuaHIiZBS
— ANI_HindiNews (@AHindinews) July 8, 2023
कूचबिहारमधील फोलिमारी येथे हिंसाचार भडकला असून, तिथे भाजपाच्या पोलिंग एजंटची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली. त्यात सीपीआयएम उमेदवार अनिता अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. दरम्यान, २४ परगणा जिल्ह्यातही रस्त्याच्या शेजारी टीएमसीचा बॅनर घेऊन बसलेल्या कार्यकर्त्याची पोलिसांनी पिटाई केली.
पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यातील ६३ हजार २२९ ग्रामपंचायतीच्या जागा, पंचायत समितीच्या ९ हजार ७३० जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांवर हे मतदान होत आहे. या मतदानामधून सुमारे ५.७ कोटी मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे. २०२४ रोजी होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची ही निवडणूक म्हणजे पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे.