प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 08:01 IST2025-08-21T07:57:08+5:302025-08-21T08:01:51+5:30
मध्य प्रदेशातून १३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.

प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर
Archana Tiwari Missing Case: मध्य प्रदेशच्या भोपाळमधून अचानक बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय वकील अर्चना तिवारीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाने स्वतःच संपूर्ण योजना आखली होती आणि ती नेपाळमध्ये निघून गेली होती. घरच्यांनी लग्नासाठी दबाव आणल्यामुळे अर्चनाने दुसऱ्या देशात पळून जाण्याचा निर्णय घेतला होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी तिला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर तिने हे सत्य उघड केलं.
मध्य प्रदेशच्या कटनी इथली रहिवासी असलेली आणि इंदौरमध्ये न्यायालयीन सेवेची तयारी करत असलेली अर्चना तिवारी ७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिने इंदूरहून कटनीला जाणारी नर्मदा एक्सप्रेस ट्रेन पकडली. पण प्रवासादरम्यान ती भोपाळमध्ये बेपत्ता झाली. त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ट्रेनमध्ये तिच्या सीटवर तिचे सामान सापडलं होतं. यामुळे कुटुंबिय आणखी घाबरले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.१३ दिवस विविध ठिकाणी अर्चनाचा शोध सुरु होता. शेवटी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील नेपाळ सीमेजवळ अर्चना सापडली.
भोपाळ रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत अर्चना तिवारीने सांगितले की तिचे कुटुंब तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासाठी जोडीदार शोधत होते. लग्नासाठी वारंवार येणाऱ्या दबावामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. तिचे लग्न एका पटवारी मुलाशी ठरवण्यात आल्याचे कुटुंबियांनी तिला सांगितले होते. ७ ऑगस्ट रोजी ती रक्षाबंधनासाठी नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीला निघाली, पण घरी जाण्यासाठी ती तयार नव्हती. तिने ठरवले की ती दिवाणी न्यायाधीश होईपर्यंत घरी जाणार नाही किंवा लग्न करणार नाही. अर्चनाने ही सगळी योजना तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून आखली होती.
"७ ऑगस्टच्या रात्री इंदूर-बिलासपूर ट्रेनने प्रवास करणारी अर्चना तिवारी बेपत्ता झाली आणि १३ दिवसांनी ती नेपाळ सीमेवरून सापडली. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने त्यांना सर्व काही सांगितले. अर्चनाने सांगितले की तिचे कुटुंब तिच्यासाठी मुलगा शोधत होते, पण तिला आत्ता लग्न करायचे नव्हते. जानेवारीमध्ये तिची सरांश चोपचेनशी मैत्री झाली होती, ज्याच्यासोबत तिला राहायचं होतं. लग्नावरुन अर्चनाचा कुटुंबाशी खूप वाद झाला. तिने सरांशला कुटुंबाशी झालेल्या वादाबद्दल आणि तिच्यासाठी शोधलेल्या मुलाबद्दल सांगितले. त्यानंतर सरांश आणि अर्चनाने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये तेजिंदर सिंगने त्यांना मदत केली. तिघेही हरदा येथे भेटले आणि त्यांनी अशी योजना आखली की ते एका नवीन ओळखीसह नवीन ठिकाणी जातील आणि एक नवीन जीवन सुरू करतील. त्यांनी एका मुलीच्या ट्रेनमधून पडल्याची बातमी पसरवण्याचा कटही रचला," अशी माहिती पोलिसांनी दिली.
"तिघेही ट्रेनमध्ये चढले आणि अचानक तेजिंदरने अफवा पसरवली की मुलगी ट्रेनमधून पडली आहे, तर सारांश आणि अर्चना ट्रेनमधून उतरल्यानंतर पळून गेले होते. तेजिंदरला आरपीएफने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा आढळून आल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला आपल्यासोबत नेले. पण तेजिंदरने संपूर्ण कट उघड केला. अर्चनाने तिचे सर्व सामान ट्रेनच्या सीटवर सोडले होते, जेणेकरून सर्वांना वाटेल की ती पळून गेली नाही तर पडली आहे. जेव्हा प्रकरण वाढू लागले तेव्हा अर्चना आणि सरांश यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच ते नेपाळला पोहोचले. ते नेपाळमार्गे दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत होते," असेही पोलिसांनी सांगितले.