ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 08:26 IST2025-10-04T08:25:29+5:302025-10-04T08:26:07+5:30
वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला

ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
चंदीगड - हरियाणाच्या पलवल पोलिसांनी २ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यातील एक वसीम अकरम आणि दुसरा तौफीक आहे. हे दोघेही युट्यूबर असून तपासात हे पाकिस्तानी उच्चायोगासोबत मिळून हेरगिरीचं नेटवर्क चालवत असल्याचं समोर आले. यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर हेरगिरीचं प्रकरण चर्चेत आले. याआधी मलेरकोटलाच्या गुजाला, यामीन आणि अमन यामध्येही हेच पॅटर्न समोर आले आहेत.
पाकिस्तानी उच्चायोग केवळ व्हिसा देण्याचं काम करत नाही तर ते भ्रष्टाचार आणि हेरगिरीसाठी शस्त्र बनलं आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे. पलवलमध्ये पकडलेले वसीम आणि तौफीक लोकांकडून पैसे घेऊन त्यांना पाकिस्तानी व्हिसा देण्याचं आश्वासन देत होते. जे पैसे ते कमवायचे, त्यातील मोठा हिस्सा पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱ्यांना देत होते. दानिश नावाचा कर्मचारी हे पैसे आयएसआय एजेंटपर्यंत पोहचवायचा. हे एजेंट टूरिस्ट व्हिसावर भारतात यायचे आणि इथे राहून त्यांच्या हेरगिरीचं काम करायचे.
वसीम अकरमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला. त्याचा व्हिसा रद्द झाला होता परंतु पाकिस्तानी हाय कमिशनमधील कर्मचारी जाफर उर्फ मुजम्मिल हुसैन याला २० हजारांची लाच दिल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता. मे २०२२ मध्ये तो पाकिस्तानच्या कसूरला गेला होता. तिथून परतल्यानंतर तो जाफरसोबत व्हॉट्सअप संपर्कात होता. त्यानंतर त्याने पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम सुरू केले. त्याच्या खात्यात ४-५ लाख जमा झाले. त्यातील मोठी रक्कम जाफर आणि इतर कर्मचाऱ्यांना मिळत होती. पैशांशिवाय वसीम आणि तौफीक पाक एजेंटला सिम कार्ड, ओटीपी आणि भारतीय सैन्याशी निगडीत संवेदनशील माहिती शेअर करत होते.
पंजाब आणि हरियाणा येथे सैन्याच्या मोठमोठ्या छावण्या, एअरफोर्स स्टेशन, मिसाइल आणि डिफेन्स सिस्टम आहेत. त्यामुळे पाकिस्तान इथल्या परिसरातील अनेक लोकांना टार्गेट करते, जे लोक पाकिस्तानला फिरण्यासाठी येतात. त्यांना लालच, पैसे आणि व्हिसा मदतीच्या माध्यमातून ते भारताची हेरगिरी करण्यास भाग पाडतात. पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकारी आधी लाच मागतात, त्यानंतर ते लोकांना हेरगिरीच्या जाळ्यात ढकलतात. त्यांच्याकडून सिमकार्ड, बँक अकाऊंट, ओटीपी, सैन्याशी निगडीत माहिती घेतात. त्या बदल्यात त्यांना पैसे देतात. ज्यावेळी हे नेटवर्क समोर आले तेव्हा भारताने जाफर आणि दानिश या दोघांना भारत सोडण्याचे आदेश दिले परंतु या अटकेतून पाकिस्तानी उच्चायोग केवळ व्हिसा देण्याचं काम करत नाही तर भारतात राहून हेरगिरीचं नेटवर्क उभे करण्याचा कट रचत आहेत हे समोर आले आहे.