मंत्रालयातील लाचखोर क्लर्क एसीबीच्या सापळ्यात; ५० हजारांची मागितली लाच, ३५ हजार राेख घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:32 IST2026-02-13T06:32:02+5:302026-02-13T06:32:38+5:30
परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मागितले हाेते ५० हजार रुपये, पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सापळा रचण्यात आला आहे

मंत्रालयातील लाचखोर क्लर्क एसीबीच्या सापळ्यात; ५० हजारांची मागितली लाच, ३५ हजार राेख घेताना अटक
मुंबई - मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला. मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती.
‘एसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ढेरंगे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीत ढेरंगेने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सापळा रचण्यात आला आहे. तडजोडीअंती ढेरंगे तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये घेण्यास तयार झाला. अखेर, ३५ हजाराची लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरहरी झिरवाळ हे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. त्यांचे कार्यालय मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. आरोपी कारकुनाने लाच मागण्यासाठी झिरवाळ यांच्या खासगी सचिवाच्या नावाचा वापर केल्याचे समजते. मात्र त्याबाबत एसीबीकडून अद्या दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
‘त्या’ मंत्र्यांना हटविण्याची काँग्रेसची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोर प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. जनतेची कामे पैशांशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले.