इंग्रजीच्या शिक्षकाने घेतला जीवघेणा बदला; लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवले 'मृत्यूचं पार्सल', मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:10 IST2025-05-29T13:09:24+5:302025-05-29T13:10:02+5:30
ही चिठ्ठी गुन्हे शाखेकडे सोपवली, हाच पुरावा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. हे पत्र सौम्यच्या आई वडिलांना दाखवले.

इंग्रजीच्या शिक्षकाने घेतला जीवघेणा बदला; लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवले 'मृत्यूचं पार्सल', मग...
नवी दिल्ली - सौम्य आणि रिमाच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. २६ वर्षीय सौम्य शेखर साहू सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. नव्या सुनेच्या स्वागतासाठी साहू कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. २३ फेब्रुवारी २०१८ च्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता घरच्या दरवाजा कुणीतरी ठोकावला. सौम्यने दरवाजा उघडला तेव्हा दाराबाहेर कुरिअर बॉय उभा होता. त्याच्याकडे एक पार्सल होते. १८ फेब्रुवारीला लग्न झाले होते त्यामुळे एखाद्या मित्राने गिफ्ट पाठवले असेल असं सौम्यला वाटले. पार्सलवर सौम्यचे नाव लिहिले होते. रायपूरला राहणाऱ्या एसके शर्मा नावाच्या व्यक्तीने सौम्यच्या नावाने पार्सल पाठवले होते. २३० किमी अंतरावरील रायपूर इथं एसके शर्मा नावाचा कुठला मित्र आहे हे सौम्यला समजलं नाही.
हिरव्या रंगाच्या कागदात असलेल्या पार्सलमधून एक सफेद धागा बाहेर दिसत होता. सौम्यने पार्सल घेऊन रिमाला आवाज दिला. पार्सल घेऊन तो किचनच्या दिशेने गेला. पॅकेट उघडण्यासाठी सौम्यने तो सफेद धागा खेचला तेव्हा अचानक जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यामुळे किचनमधील छतही उडाले. सौम्य, रिमा आणि त्याची बहीण रक्तबंबाळ होऊन तिथेच पडले. आवाज ऐकून आसपासचे लोक धावत आले. गंभीर अवस्थेतील या तिघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.
मृत्यूचं पार्सल कुणी पाठवले?
या स्फोटात सौम्य आणि त्याची बहीण गंभीर जखमी होते. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सौम्यच्या पत्नीची प्रकृतीही चिंताजनक होती. सौम्यसोबत कुणाचं शत्रुत्व नव्हते मग त्याच्या घरात हे काय घडले अशी चर्चा लोक करू लागले. रिमा शुद्धीवर येताच पोलिसांनी तिला पार्सलबाबत विचारणा केली. ते पार्सल कुणी पाठवले, अखेर रायपूरमध्ये एसके शर्मा नावाचा कोण आहे याची चौकशी पोलीस करू लागले. मित्र, नातेवाईकांसह १०० जणांहून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली.
सौम्यचा मोबाईल, लॅपटॉप तपासला गेला, पण कुठलाही पुरावा सापडला नाही. ज्या कुरिअर कंपनीने पार्सल पाठवले त्याच्या पत्त्यावर पोलीस पोहचले. तिथेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने काही हाती लागले नाही. पार्सल पाठवणाऱ्याने पूर्ण प्लॅनिंगसह कुरिअर कंपनी निवडली होती. पार्सल पाठवताना नाव आणि पत्ताही बनावट लिहिला होता. कुरिअर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता धक्कादायक गोष्ट पुढे आली.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हत्येचा प्लॅन
हे पार्सल ३ दिवसांआधी बुक केले होते. डिलिव्हरी बॉय तिथे देण्यासाठी पोहचला होता तेव्हा लग्नाचे रिस्पेशन सुरू होते. त्यामुळे तो परतला आणि ३ दिवसांनी पार्सल पोहचवले. कसून चौकशी केली असता पोलिसांना काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. हे प्रकरण गुंतागुंतीचे बनत असताना बलांगीर पोलिसांच्या कार्यालयात निनावी पत्र सापडले. त्यात स्फोटाचे पार्सल एसके सिन्हा नावाने पाठवले होते, एसके शर्मा नाही. या प्रोजेक्टमध्ये ३ जणांचा सहभाग होता. हे तिघे तुमच्यापासून दूर आहेत. विश्वासघात केल्याने हा स्फोट घडवला गेला. पोलिसांकडे जाऊन काही लागणार नाही म्हणून हे पाऊल उचलले गेले. या प्रकरणापासून दूर राहा आणि निर्दोष लोकांना त्रास देणे बंद करा असं पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळवण्यात आले.
ही चिठ्ठी गुन्हे शाखेकडे सोपवली, हाच पुरावा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. हे पत्र सौम्यच्या आई वडिलांना दाखवले. सौम्यच्या आईची मैत्रिण कॉलेज टिचर होती. त्यांनी अनेकदा ही चिठ्ठी वाचली आणि त्यातील हस्ताक्षर, शब्द हे त्यांच्या कॉलेजमधील इंग्रजीच्या टीचरसोबत जुळत असल्याचे लक्षात आले. या टीचरचं नाव होते, पुंजीलाल मेहर..मागील वर्षी पुंजीलाल यांना हटवून सौम्यच्या आईला प्रिंसिपल बनवले होते. त्यामुळे ते खूप त्रास देत होते. अनेकदा दोघांमध्ये वाद झाला. पोलीस पुंजीलाल यांना चौकशीसाठी बोलावतात. सुरुवातीला तो पोलिसांना बनावट कहाणी ऐकवत असतो परंतु पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच पुंजीलाल गुन्हा कबुल करतो. ते पार्सल पुंजीलाल यानेच पाठवलेले असते. सौम्यच्या आईसोबत बदला घेण्यासाठी पुंजीलालने हा प्लॅन रचला. त्याने सौम्यच्या लग्नानंतर गिफ्टचे पार्सल त्याच्या घरी पाठवून स्फोट घडवला. त्यात सौम्य आणि त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. दरम्यान, या प्रकरणी ७ वर्ष कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर २८ मे २०२५ रोजी आरोपी पुंजीलाल मेहर याला कोर्टाने दोषी मानत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.