नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 14:24 IST2025-06-04T14:20:42+5:302025-06-04T14:24:23+5:30

ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले

bus service reaches naxal affected abujhmad kutul locals express happiness | नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

रायपूर: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त अबूझमाड प्रदेशात विकासयोजना गती घेताना पाहायला मिळत आहेत. नियद नेल्ला नार या योजनेअंतर्गत नारायणपूर जिल्ह्याच्या अंतर्गत भागात १४ नवीन पोलिस छावण्या स्थापन केल्यानंतर, या परिसरात आता रस्ते, पूल आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीचा झपाट्याने विस्तार होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ मे २०२५ रोजी पहिल्यांदाच नारायणपूर ते कुतुल गावासाठी थेट बस सेवा सुरू केली. ही बस सेवा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४९ किमी अंतरावर असलेल्या कुतुल गावासह कुरुषनार, बसिंग, कुंदला, कोहकामेटा, ईरकभट्टी, कच्चपाल आणि कोडलियार यासारख्या दुर्गम गावांना जोडत आहे. बस सेवा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष जल्लोष आणि आनंदाचे वातावरण आहे.

याआधी या गावातील लोकांना पायी प्रवास करावा लागत असे. पावसाळ्यात नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेणे खूप कठीण होते. अनेकदा गावकऱ्यांना आजारी व्यक्तीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात जावे लागत असे. परंतु, आता बससेवा सुरू झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली असून, ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामांसाठी वेळेवर नारायणपूरला पोहोचण्याची सुविधा मिळाली आहे. 

नारायणपूर ते मसपूर या १४ गावांसाठी बस सेवा सुरू

नारायणपूर ते मसपूर या १४ गावांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे सदर भागातील लोकांना जिल्हा मुख्यालयाशी जोडता आले आहे. या योजनेअंतर्गत ४जी मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत. कस्तुरमेटा, मसपूर, ईरकभट्टी, मोहन्दी, होरादी, गारपा आणि कच्चापाल या गावांमधील लोक आता मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात. यामुळे केवळ दळणवळण व्यवस्थाच सुधारली नाही तर शैक्षणिक, आरोग्य आणि प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा झाली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आणि सांगितले की, अनेक वर्षांनंतर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळत आहे. नियद नेल्ला नार या योजनेने त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश आणला आहे.

 

Web Title: bus service reaches naxal affected abujhmad kutul locals express happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.