बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:09 IST2019-05-29T00:08:23+5:302019-05-29T00:09:32+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी भागातील अंबिकानगर येथे घडली.

बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी भागातील अंबिकानगर येथे घडली.
विजय ईश्वर सनान्से (२१) असे या युवकाचे नाव आहे. तो आई आणि भावासह अंबिकानगर भागात राहतो. वडिलांचे निधन झालेले असून, आई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. विजयने पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. अनेक ठिकाणी नोकरीसाठी तो फिरला; परंतु कोठेही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तीन-चार दिवसांपूर्वी विजयने वडापावचा गाडा टाकून रोजगार सुरू केला होता; परंतु त्यातही त्याला समाधान मिळाले नाही. मंगळवारी सकाळीच आई कामावर गेली होती. छोटा भाऊही बाहेर गेला. विजय एकटाच घरी होता. त्याने राहत्या घरी पत्र्याच्या बल्लीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गल्लीतील मित्रांच्या निदर्शनास आली. त्याला फासावरून उतरवून घाटीत दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अमोल मस्के करीत आहेत.