राज्यसभेत जायची संधी मिळाली, तर यावेळी रेकॉर्डब्रेक करू शकतो; रामदास आठवलेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:20 IST2026-02-28T12:15:06+5:302026-02-28T12:20:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेत जाण्याची संधी मिळाल्यामुळे परराज्यांत रिपाइंला वाढण्याची संधी मिळाली.

राज्यसभेत जायची संधी मिळाली, तर यावेळी रेकॉर्डब्रेक करू शकतो; रामदास आठवलेंचा विश्वास
छत्रपती संभाजीनगर : माझा ३ एप्रिलपर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ आहे. गेल्या १२ वर्षांपासून राज्यसभेत आहे. आता संधी मिळाली, तर आपण रेकॉर्डब्रेक करु शकतो. मात्र, आपल्या नावाची अजूनही घोषणा झालेली नाही. मात्र, नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
जागतिक बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेत जाण्याची संधी मिळाल्यामुळे परराज्यांत रिपाइंला वाढण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात मात्र आम्हाला संधी दिली जात नाही. किमान दोन खासदार निवडून आले, तरच पक्षाला मान्यता मिळते. बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आलो, तर समाजाला चांगले भवितव्य आहे. पण, बाळासाहेबांना हे मान्य नाही. ते निवडणुकांमध्ये सतत प्रयत्न करीत आहेत, पण अपेक्षित मतदान घेऊ शकत नाहीत.
अलीकडेच मनपा, नपा, जि.प.च्या निवडणुका झाल्या. त्यात आमचा एकही कार्यकर्ता निवडून आला नाही. आता प्रभाग पद्धत झाल्यामुळे हे शक्य होत नाही. प्रभाग पद्धत रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. वेळप्रसंगी कोर्टात देखील जाण्याची आमची तयारी आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, महाविहाराच्या कायद्यात सुधारणा करावी, या महाविहाराचा चेअरमन बौद्ध असावा, सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटलो आहे. चार महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन दिले आहे.
‘सीआयडी’मार्फत चौकशी व्हावी
अनुष्का पाटोळे ही लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकत होती. तिच्यावर चोरीचा आळ घेऊन कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिस अधीक्षकांनी मात्र, तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. पण, तिची आई म्हणते, ती आत्महत्या नसून हत्याच आहे. दोघांना अटक करण्यात आले आहे. सर्वच जबाबदार कर्मचाऱ्यांवर खुनाचा गु्न्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणाची ‘सीआयडी’मार्फत चौकशी झाली पाहिजे, यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत.