‘घाटी’मध्ये का आहे चिंताजनक परिस्थिती? रुग्णालयावर वाढला भर, सुविधा मात्र अपुऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:12 IST2023-10-04T06:11:29+5:302023-10-04T06:12:09+5:30
घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला.

‘घाटी’मध्ये का आहे चिंताजनक परिस्थिती? रुग्णालयावर वाढला भर, सुविधा मात्र अपुऱ्या
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे आकडे चिंता व्यक्त करणारे आहेत. प्रत्येक मृत्यूसाठी वेगवेगळे कारण आहे; मात्र घाटी रुग्णालयात ही परिस्थिती का येत आहे, यावर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे, असे ‘घाटी’तील डाॅक्टरांनीच सांगितले.
घाटी रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डाॅ.संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ.विजय कल्याणकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डाॅ.सुधीर चौधरी यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली.
यावेळी घाटीतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. एक हजार रुग्णांमागे नऊ रुग्णांचा मृत्यू ही सामान्य बाब आहे. दोन हजार रुग्णांमागे १८ पेक्षा अधिक मृत्यू झाले तर काही तरी चुकते, असे गृहीत धरावे, असे बैठकीत घाटीतील डाॅक्टरांनी म्हटले.
हे आहे वास्तव
१,१७७ खाटा, प्रत्यक्षात २ हजारांपर्यंत रुग्ण भरती.
मनुष्यबळ मंजूर खाटांनुसार. अनेक पदे रिक्त.
घाटी टर्शरी केअर सेंटर आहे. येथे गंभीर रुग्ण येणे अपेक्षित; परंतु सामान्य रुग्णांचाही भार आहे.
ग्रामीण भागासह मराठवाड्यातून गंभीर रुग्ण रेफर.
सामान्य प्रसूतीचा भार. रोज ५० ते ७० प्रसूती.
रिकव्हरी रेट अधिक
रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचे मृत्यू झाले. अत्यवस्थ आणि रेफर रुग्ण अधिक आहेत. रुग्णालयात रिकव्हरी रेट अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण अगदी कमी आहे. औषधांअभावी अथवा कोणाच्या हलगर्जीमुळे रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
- डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)