---
३ वर्षानंतर सेवेत : प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकाकडून १० हजार रुपये जमा
---
औरंगाबाद : जिल्ह्यात ९ तालुक्यात सध्या प्रत्येकी दोन ते तीन कंत्राटी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मंजूर ५५६ पैकी सध्या ५३० ग्रामसेवक कार्यरत असून २६ पदे रिक्त आहेत, तर ५ पदोन्नतीने भरावयाची पदे रिक्त असल्याने रिक्त पदांचा आकडा ३१ झाला आहे. रिक्त पदांचा कार्यभार सध्याच्या ग्रामसेवकांवर आहे. २०१५-१६ नंतर पदभरती झाली नसल्याने तेव्हापर्यंत भरलेली पदे आता नियमित झाली. मात्र, नियमित झाल्यावर कंत्राटी पदावर असताना भरलेली अनामत रक्कम परत घेण्याचा ग्रामसेवक कंटाळा करत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ग्रामपंचायतींची संख्या आता ८६७ झाली आहे. त्यासाठी पंचायत विभागाकडे ५९१ पदे मंजूर आहेत. त्यात पाच विस्तार अधिकारी, ३० ग्रामविस्तार अधिकारी, ५३० ग्रामसेवक असून त्यातील २० जण कंत्राटी स्वरूपाचे आहेत. जिल्ह्यात ३१ पदे ग्रामसेवकांची रिक्त आहेत. कंत्राटी सेवा बजावण्यापूर्वी ग्रामसेवकांना रुजू होताना १० हजार रुपयांची अनामत रक्कम गटविकास अधिकारी यांच्याकडे भरावी लागते. तीन वर्षानंतर सेवा पूर्ण झाल्यावर नियमित सेवेत समाविष्ट झाल्यावर ही रक्कम पंचायत विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजुरीनंतर परत मिळते. मात्र, ते परत घेण्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने ३० टक्क्याहून अधिक रक्कम अद्यापही पडून आहे.
---
५३०
जिल्ह्यात एकूण ग्रामसेवक
--
२०
कंत्राटी ग्रामसेवक
---
१३ ग्रामसेवक नियमित सेवेत समाविष्ट
---
२०१५-१६ नंतर भरती झाली नाही. त्यामुळे २०१५-१६ मध्ये कंत्राटी ग्रामसेवक सेवेत लागले.
३ वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण झाल्यावर सेवेत समाविष्ट झाल्यावर भरलेली अनामत रक्कम काढण्यासाठी डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान १३ जणांनी अर्ज केले.
सीईओंच्या सहीनंतर अनामत रक्कम परत दिली जाते गेल्या वर्षभरात अशा १३ जणांना १ लाख ३० हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.
----
कंत्राटी ग्रामसेवकांची सेवासमाप्ती झाल्यावर रितसर प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला पाठविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ग्रामसेवकांनी केली पाहिजे. अनामत रक्कम त्यांना तत्काळ परत मिळते. यात अडवणूक झाल्याचे अद्याप संघटनेकडे कुणीही कळवलेले नाही.
- भीमराज दाणे पाटील, अध्यक्ष, ग्रामसेवक युनियन
-----
मागणी केल्यास तत्काळ
मिळते अनामत परत
---
आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव आल्यावर ग्रामसेवकांनी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अनामत रक्कम परत करण्यात येते. अनेक जण त्यासाठीची मागणी करत नाहीत. तसेच काही जण कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे अनेकांची अनामत रक्कम पडून आहे, असे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.