शेतकऱ्यांना मॉडर्न मार्केटची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:13:52+5:302014-11-29T00:31:19+5:30
औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती.

शेतकऱ्यांना मॉडर्न मार्केटची प्रतीक्षा
औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती. मात्र, ५ वर्षे झाली तरी अजूनही येथे कंपाऊंड वॉल बांधण्याशिवाय दुसरे काम झाले नाही. एकीकडे किराणा मार्केट, फूल बाजार, कडबा व गुरांचा बाजार सुरूकरण्यासाठी बाजार समितीकडे जागा नाही. दुसरीकडे ५० एकर जमीन पडीत असून वेळेवर मॉडर्न मार्केटची उभारणी सुरू न झाल्याने येथील विकास खुंटला आहे. आज मॉडर्न मार्केट सुरू झाले असते, तर दुष्काळातही शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळाला असता.
कृषी उत्पन्न बाजार समितीने स्टेट बँक आॅफ इंडियामधून घेतलेल्या कर्जाची रक्कम थकल्याने बँकेने डीआरटी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने बाजार समितीची गट क्र. ०१, ०२ (जाधववाडी) व हर्सूल येथील १३५ व १३७ मधील एकूण १५.१५ हेक्टर जागेचा लिलाव करण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य कृषी पणन मंडळाने १४ कोटी ३३ लाख रुपये बाजार समितीच्या वतीने न्यायालयात भरले आणि बाजार समितीची जागा वाचविली. या बदल्यात बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने जाधववाडीतील १५.१५ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय ७ जून २०१० रोजी घेतला. या जागेची किंमत २५ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये ठरविण्यात आली. उर्वरित रक्कम पणन मंडळाने द्यावी, असा संचालक मंडळाने ठराव पास केला.
सुरुवातीला कृषी पणन मंडळाने जाधववाडीत प्रथम टर्मिनल मार्केट बनविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ५० एकर जागा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृ.उ.बा.कडे केली होती. बाजाराचा विकास होणार असल्याने कृ.उ.बा.ने उर्वरित जागा पणन मंडळाला दिली.
कृषी पणन मंडळाने जाधववाडीत मॉडर्न मार्केट उभारण्याची घोषणा केली. यानंतर पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे व शिष्टमंडळाने २ डिसेंबर २०१२ रोजी बाजार समितीला भेट दिली होती. येथील जागेची पाहणी करून मॉडर्न मार्केटचा खाजगी कंपनीकडून आराखडा तयार करून घेण्यात येणार होता. मात्र, अजूनही मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी कोणतीच हालचाल कृषी पणन मंडळाने केली नाही.