पाण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:17 IST2019-03-30T23:17:19+5:302019-03-30T23:17:55+5:30
पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.

पाण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्याचा बळी
औरंगाबाद : पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.
अक्षय महेंद्र चेट्टी (१६, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अक्षयने नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न ठरले आहे. त्याचे वडील पक्षाघातामुळे बेडवर पडून असल्याने घरातील लहान-मोठी कामे अक्षयला करावी लागत. तो राहतो त्या परिसरात पाणीटंचाई असल्याने अक्षयसह परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नेहमीप्रमाणे अक्षय शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लास्टिकची कॅन घेऊन मोपेडवरून पाणी आणण्यासाठी छावणी परिसरात जात होता. लष्कराच्या कॅन्टीनसमोरून जात असताना मागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने उजव्या बाजूने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो मोपेडसह ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून छावणी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लष्कराचे जवान आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ट्रकखालील मृतदेह काढून घाटीत हलविला. गुन्हा नोंदवून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.
चौकट
अर्धा तास होता मृतदेह घटनास्थळी पडून
ट्रकच्या चाकाखाली दबलेला मृतदेह कसा काढावा, हे प्रत्यक्षदर्शींना समजत नव्हते. यामुळे सुमारे अर्धा तास घटनास्थळी मृतदेह पडून होता. त्यानंतर आधी मोपेड ओढून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर हळूच ट्रक पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या गाडीतून घाटी रुग्णालयात हलविण्यात आला.
चौकट
वृद्धापकाळाची काठी हरवली
अक्षयचे वडील एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरीला होते. पॅरेलिसीसमुळे त्यांची नोकरी गेली आणि ते बिछाण्यावर पडून आहेत. वडील आजारी असल्यापासून अक्षय धडपड करीत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांची वृद्धापकाळाची काठी हरवली. दोन बहिणींचा लाडका भाऊराया गेल्याने चेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.