ट्रॅव्हल्स-रिक्षा अपघातात ३ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:42 IST2019-07-16T23:42:48+5:302019-07-16T23:42:58+5:30
ट्रॅव्हल्स व लोडिंग रिक्षा अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर चौफुलीवर घडली.

ट्रॅव्हल्स-रिक्षा अपघातात ३ जण जखमी
वाळूज महानगर: ट्रॅव्हल्स व लोडिंग रिक्षा अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूर चौफुलीवर घडली. पंढरीनाथ भानुदास आमले (३५, रा. वडगाव कोल्हाटी), गणेश पुंजाजी थाबडे (४०, रा. साजापूर) व विलास नारायण चोपडे (३५, रा. रांजणगाव) अशी जखमींची नावे आहेत.
जखमी तिघेही खाजगी कंपनीचा ट्रान्सफार्मर आणण्यासाठी लोडिंग रिक्षा (एमएच- २०, डीई- २६८९) घेवून जळगाव येथे गेले होते. ते सोमवारी लोडिंग रिक्षातून ट्रान्सफार्मर घेवून येत असताना साजापूर चौफुलीवर नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने (एमएच- ४०, बीजी- २७६०) धडक दिली. यात तिघेही जखमी झाले. तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ट्रॅव्हल्सचालक संतोष बजरंग शास्त्री (रा. नाशिक) याला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघातामुळे ट्रॅव्हल्समधील २३ प्रवासी मुलांसह साजापूर चौफुलीवर अंधारात जवळपास अर्धा ताटकळत थांबले होते. अखरे तासभराने चालकाने पर्यायी बसची व्यवस्था केल्यानंतर नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.