सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीशिवाय चित्रपटगृहे उघडणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:31 IST2020-11-10T14:31:03+5:302020-11-10T14:31:55+5:30
राज्य शासनाने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करताना पन्नास टक्के प्रवेश क्षमतेची अट घातली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीशिवाय चित्रपटगृहे उघडणार नाहीत
औरंगाबाद : राज्य शासनाने सर्व चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली असली तरी महापालिकेने आता कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चित्रपटगृहात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतरच चित्रपटगृह सुरू होईल. कोरोना चाचणी केल्याचा अहवाल महापालिकेला सादर करावा लागेल.
राज्य शासनाने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करताना पन्नास टक्के प्रवेश क्षमतेची अट घातली आहे. औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू होताना महापालिकेने खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व चित्रपटगृहचालकांना पत्र पाठवून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचे कळवले आहे. या सर्वांची आरटीपीसीआर पद्धतीने चाचणी केली जाणार आहे. कोरोना चाचणी केली तरच चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देऊ, असे पालिकेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. अदालत रोडवरील तापडिया मैदानात कोरोना चाचणी केली जाणार आहे. खिंवसरा सिनेफ्लेक्ससह आंबा-अप्सरा चित्रपटगृहाच्या २८ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, सर्वांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले, अशी माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. अन्य चित्रपटगृहांच्या कर्मचाऱ्यांची चाचणीदेखील केली जाणार आहे. शहरातील सर्व आठवडी बाजारात तपासणी करण्यात येत आहे.