परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा कडाडला
By Admin | Updated: May 25, 2014 01:09 IST2014-05-25T00:55:19+5:302014-05-25T01:09:16+5:30
परभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात २४ मे रोजी जिल्ह्याचा पारा ४३.५ अंशावर पोहोचला. दिवसभरात कडक ऊन पडल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली.
परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा कडाडला
परभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात २४ मे रोजी जिल्ह्याचा पारा ४३.५ अंशावर पोहोचला. दिवसभरात कडक ऊन पडल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. शनिवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. सूर्य जसजसा डोक्यावर येत होता तसतसा उन्हाची तीव्रता वाढत गेली. दुपारनंतर उन्हाचा कडाका अधिकच वाढला होता. या उन्हाळी हंगामात प्रथमच जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च असे ४३.५ अंश नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने दिली. वाढलेल्या उन्हाचा परिणाम रस्त्यांवरील वाहतुकीवर दिसून आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत नागरिक घराच्या बाहेर पडले नाहीत. शहरातील बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम झाला. बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊन तापले नाही. मे महिन्याच्या मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस झाल्याने ऊन्हाची तीव्रता यावर्षी जाणवली नाही. परंतु सरत्या आठवड्यात ऊन वाढत गेले. आठवडाभरात ४० अंशाच्या खाली पारा उतरलेला नव्हता. त्यात शनिवारी ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शनिवारी दिवसभर उकाड्यात मोठी वाढ झाली होती. वातावरणात उकाडा वाढलेला असताना त्यात भर पडली ती विजेच्या भारनियमनाची. वीज गूल झालेली असल्याने उकाड्यामुळे नागरिकांची तगमग होत होती. बाहेर थांबावे तर उन्हाच्या झळा आणि घरात बसावे तर कमालीचा उकाडा, अशा परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त होते. सायंकाळच्या सुमारास शहरात चहेलपहेल वाढू लागली. शहरातील राजगोपालाचारी उद्यान, विद्यापीठ परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. विशेष करुन उद्यानामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी रहात आहे. या आठवड्यात उन्हाचा पारा वाढलेलाच राहिला. तापमान ४० अंशाच्या खाली उतरले नाही. उन्हाळ्याचे आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत. यापुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संपूर्ण उन्हाळ्यात तापमान जेमतेम राहिले. शेवटच्या टप्प्यात ऊन तापू लागले आहे. तापमान जेवढे जास्त वाढेल तेवढा पाऊस जास्त होण्याची शक्यता असते. (प्रतिनिधी)आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून, त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ऊन वाढत चालल्याने नागरिक दुपारच्या वेळी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. उन्हाचा असर सायंकाळपर्यंत रहात असल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतो. शनिवारी देखील वाढलेल्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसून आली. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सायंकाळी उद्यानात गर्दी वाढत चालली आहे.