औरंगाबाद : १५ दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मुलाच्या विरहात असलेल्या ७० वर्षीय वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जाधववाडी परिसरातील सनी सेंटरजवळ घडली. अब्दुल रऊफ शाबूमियाँ (७०, रा. मिसारवाडी), असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, अब्दुल रऊफ यांच्या मुलाचा १५ दिवसांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ते फार दु:खी होते. मुलाचा विरह त्यांना सहन झाला नाही. सनी सेंटरजवळ त्यांचे टेलरिंग दुकान आहे. या दुकानाच्या छताच्या हुकाला दोरीने त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर फेरोज युसूफ आणि अन्य नातेवाइकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी अब्दुल रऊफ यांना तपासून मयत घोषित केले. याविषयी सिडको ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार विठ्ठल काकडे याप्रकरणी तपास करीत आहेत.