Join us  

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:03 AM

सहा वर्ष हिनाने मालिकेत काम केलं मात्र नंतर तिला चक्क काढून टाकण्यात आल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला.

स्टार प्लसवरचा लोकप्रिय शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. तब्बल १५ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत अनेक लीपही घेण्यात आलेत. काही दिवसांपूर्वीच मुख्य भूमिकेत असलेल्या शहजादा धामी आणि प्रतिक्षा होनमुखेला मालिकेतून काढून टाकण्यात आलं. यामुळे मालिका चर्चेत होती. आता निर्माते राजन शाही (Rajan Shahi) यांनी एक खुलासा केला आहे. सुरुवातीच्या काळात मालिकेतील मुख्य अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली होती. सहा वर्ष हिनाने मालिकेत काम केलं मात्र नंतर तिला चक्क काढून टाकण्यात आल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला.

'टेली टॉक इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत राजन शाही म्हणाले, "हिना खान स्क्रीप्टमध्ये खूप दखल द्यायची. अनेक घटनांमुळे वातावरण बिघडत होतं. शेवटी हिनासोबत आम्ही मीटिंगही केली. मला आठवतंय एक दिवस शूटिंग सुरु होतं आणि हिनाने काही संवाद बोलण्यास नकार दिला जे शिवांगी जोशीच्या सपोर्टमध्ये होते. हिनाने स्क्रीप्टमध्ये दखल देत संवाद बोलणार नाही असं सांगितलं. त्या दिवशी मी तिला म्हणलं की जे लिहिलंय तेच बोलावं लागेल नाहीतर तू सेट सोडून जाऊ शकतेस."

ते पुढे म्हणाले, "हिना पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसून राहिली. रात्री जेव्हा ती घरी जायला निघाली तेव्हा आम्ही तिला तिच्या टर्मिनेशनचा निरोप दिला आणि पुन्हा आता सेटवर येण्याची गरज नाही असंही कळवलं. तरी पुढच्या दिवशी ती सेटवर आली आणि तिने संवाद जसे लिहिले आहेत तसेच ती बोलली. पण माझी तिला पुन्हा संधी देण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच पॅकअपवेळी तिला पुन्हा कळवण्यात आलं की आता तिचा या मालिकेशी संबंध नाही. हिनाने शिवांगीसोबत केलेल्या त्या सीन्सलाही मी काढून टाकलं. ती गेल्यानंतर टीमला पुन्हा काम करण्यासाठी तीन दिवस लागले. यानंतर शोचा टीआरपीही वाढल्याचं दिसलं."

टॅग्स :हिना खानटिव्ही कलाकारये रिश्ता क्या कहलाता है