'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:36 IST2021-07-28T19:32:16+5:302021-07-28T19:36:11+5:30
Corona vaccine in Aurangabad केंद्र शासनाकडून राज्याला मुबलक डोस मिळत नाहीत. त्यामुळे अत्यल्प लस डोस प्राप्त होते.

'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर संबधित व्यक्ती ७० टक्के, दुसरा डोस घेतला तर ९७ टक्के सुरक्षित राहील असा दावा केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी लस घेण्यावर प्रत्येक नागरिक भर देत आहे, परंतु शहरात लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून नागरिकांना लसीसाठी भटकत आहेत. पहिला डोस घेतलेल्या ९२ हजार नागरिकांना कालमर्यादा उलटूनही दुसरा डोस मिळेना. दुसऱ्या बाजूला पहिल्या डोससाठीही गर्दी होते आहे. अशा स्थितीत तिसरी लाट रोखणार तरी कशी? असा प्रश्न नागरिकच उपस्थित करीत आहेत.
अद्याप पहिलाच डोस मिळेना
महापालिकेने मागील काही दिवसांपासून फक्त दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले आहे. पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागतेय. ऑनलाइन बुकिंग आम्हाला करता येत नाही. लसीकरण केंद्रावर दररोज चकरा मारून थकलोय. पूर्वी थेट केंद्रावर गेल्यावर पहिला डोस मिळत होता. हीच पद्धत पुढेही सुरू ठेवावी.
- रवी मोहिते, लाभार्थी
कोरोनाकाळात अनेक संकटांचा सामना करावा लागला. सुदैवाने लस सापडली. पण ती सर्वसामान्य गोर-गरीब नागरिकांना मिळत नाही. लसीकरण केंद्रावर मर्जीतील मंडळींनाच टोकन, मागील दाराने प्रवेश दिला जातो. सर्वसामान्यांना लस संपली, उद्या या एवढाच निरोप देण्यात येतो. लसीकरणात पारदर्शकता असायला हवी. ५० टक्के पहिला, ५० टक्के दुसरा डोस सर्वांना द्यावा.
- शैलेश जाधव , लाभार्थी
लसीकरण का वाढेना
केंद्र शासनाकडून राज्याला मुबलक डोस मिळत नाहीत. त्यामुळे अत्यल्प लस डोस प्राप्त होते. मागणीच्या तुलनेत १० टक्केही पुरवठा नाही. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. एकदा १० ते ११ हजार डोस आल्यानंतर आठ दिवस लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाची गती प्रचंड मंदावली आहे. दुसरा डोस मिळावा म्हणून औरंगाबाद शहरातच ९२ हजारांहून अधिक नागरिक प्रतीक्षा यादीत आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही डोसची संख्या वाढवून मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
१५ केंद्रांवर लसीकरण सुरू
औरंगाबाद शहरात ११५ वॉर्डात लसीकरण करण्याची सोय मनपाने उभी केली. लस डोस पुरेसे मिळत नसल्यामुळे अलीकडे ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मंगळवारी मनपाकडे ३ हजारच डोस शिल्लक होते. त्यामुळे अवघ्या १५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात आले. लस साठा उपलब्ध झाला तर पुन्हा ३९ केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गरोदर महिला, अंथरुणावरील रुग्णांना घरी जाऊन लस देणे अद्याप सुरूच झालेले नाही.
आतापर्यंत झालेले लसीकरण :
वयोगट-पहिला डोस-दुसरा डोस
हेल्थलाइन वर्कर- २९,२३२-१६,५३८
फ्रन्टलाइन वर्कर- ३७,६६६,२१,६५८
१८ ते ४४- १,५७,९०९- ११,५२४
४५ ते ५९ -१,०१,२५५-६६,८६६
६० पेक्षा अधिक- ६८,३८१-४४,७२०