सोलापूर-धुळे महामार्गाचे अडले घोडे
By Admin | Updated: May 24, 2014 02:05 IST2014-05-24T01:55:14+5:302014-05-24T02:05:48+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचा विकास झाला पाहिजे, अशी ओरड नेहमीच होत असते; पण केंद्र शासनाने महामार्गाच्या विकासासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली
सोलापूर-धुळे महामार्गाचे अडले घोडे
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचा विकास झाला पाहिजे, अशी ओरड नेहमीच होत असते; पण केंद्र शासनाने महामार्गाच्या विकासासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली; पण शासकीय अनास्थेमुळे सोलापूर-धुळे या ४५३ कि. मी. च्या महामार्गाचे काम रखडले आहे. या महामार्गात येणार्या सोलापूर, धुळे, जळगाव जिल्ह्याने तत्परता दाखवून ८० टक्के भूसंपादन केले. मात्र, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने पाचोड ते कन्नडपर्यंतच्या १२० कि. मी. रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के जमीन जोपर्यंत ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत टेंडर काढता येत नाही. ‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (एनएचएआय) कडे पाचोड ते कन्नडपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा तयार आहे. यासाठी वर्षभर अधिकार्यांनी सखोल अभ्यास केला. केंद्र शासनाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र, घोडे भूसंपादनामुळे अडकले. सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास औरंगाबादेत होणारी कोंडी कमी होईल. सोलापूर ते पाचोडपर्यंतच्या रस्त्याचे भूसंपादन झाले आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यांतील महामार्गाचेही भूसंपादन झाले आहे. आता पाचोड ते भांबरवाडी (कन्नड) या १२० कि. मी.च्या रस्त्याचे भूसंपादन बाकी आहे. यात ४५० हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद-उस्मानाबाद आणि सोलापूर हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यामुळे ताशी ४० ते ५० कि. मी. च्या कमी वेगाने या रस्त्यावरून वाहने चालवावी लागतात. याच रस्त्यावर पाचोड, आडगाव जावळे, राजापूर, रोहिलागड फाटा, मुरमा शिवार, डोणगाव फाटा या मार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे.भूसंपादनाचे काम जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मात्र, अजूनही या भूसंपादनासाठी कोणतीच हालचाल शासकीय पातळीवर सुरू झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.रस्ता चौपदरी करताना या रस्त्यावरील अरुंद वळणे रुंद करून सरळ करण्यात येणार आहेत. यामुळे ताशी १०० कि. मी. च्या वेगात या रस्त्यावरून वाहने जातील, त्यानुसार महामार्गाचे डिझाईन करण्यात आले आहे. सोलापूर-औरंगाबाद-धुळे या रस्त्याला १९९९ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आणि तब्बल १० वर्षांनंतर म्हणजे २००९ यावर्षी रस्त्याला चौपदरीकरणाची मंजुरी मिळाली. या ४५३ कि. मी. च्या महामार्गासाठी केंद्र सरकारने ७५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.बीड बायपासला पर्याय म्हणून औरंगाबादेत आणखी एक बायपास तयार येईल. निपाणी, आडगाव, गांधेली, सातारा, नक्षत्रवाडी, नगर रोड, भांगसीमातागड, माळीवाडा, कसाबखेडामार्गे वेरूळला रस्ता जोडण्यात येणार आहे. हा बायपास ५२ कि. मी. चा असणार आहे. या मार्गावर ८ उड्डाणपूल, माळीवाडा-दौलताबाद येथे एक रेल्वे ब्रीज तसेच खाम नदीवर २५० मीटरचा ब्रीज उभारण्यात येणार आहे. परजिल्ह्यांत जाणारी मालवाहतूक नवीन बायपास रोडने जाईल. परिणामी, शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल.