सिल्लोडची तहान वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:05 IST2019-05-08T00:04:54+5:302019-05-08T00:05:26+5:30

३० टँकरची मागणी : ‘खेळणा’ कोरडाठाक; २० दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक

 Sillodchy thirst increased | सिल्लोडची तहान वाढली

सिल्लोडची तहान वाढली

सिल्लोड : सिल्लोड शहरासह १२ गावांची तहान भागवणारा खेळणा मध्यम प्रकल्प जवळपास कोरडा पडला असून धरणामध्ये खोदण्यात आलेल्या चरांमधूनच सध्या पाणीपुरवठा सुरु आहे. केवळ १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी चरामध्ये शिल्लक आहे. यामुळे सिल्लोड शहरात ३० टँकर सुरु करावे, अशी मागणी नगर परिषदेने तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सिल्लोड शहरात सध्या सहा दिवसांआड नळाला पाणी सोडण्यात येत आहे. रमजान महिन्यात वाढणारी पाण्याची मागणी बघता ५ दिवसांआड पाणी सोडण्याचा विचार नगर परिषद करताना दिसत आहे. यासाठी न.प. पदाधिकाऱ्यांनी खेळणा प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली व पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी नगर परिषद पाणीपुरवठा कर्मचारी व अधिकाºयांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
१३ गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रलंबित
तालुक्यातील बोरगाव वाडी, वांगी खुर्द, वांगी बु., कोटनांद्रा, धानोरा, मोढा बु, मुर्डेश्वर वाडीवस्ती, सारोळा, आमसरी, उंडणगाव, देऊळगाव वाडी, सावखेडा खुर्द, सावखेडा बु. या १३ गावांचे टँकरचे प्रस्ताव शासन स्तरावर गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित पडले आहेत. यामुळे या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
विभागीय आयुक्तांच्या सुचनांकडे कानाडोळा
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मागील आठवड्यात तालुक्याच्या पाणीटंचाईचा आढावा घेऊन केळगाव येथे टँकर भरणा पॉइंटमध्ये वाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनांवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत होताना दिसत आहे.
तालुक्यात ७० रुपये देऊनही ड्रमभर पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.
दुष्काळाची भीषण वाढली असून गावागावात रोहयो कामे सुरु करण्याची मागणी होत आहे. काम नसल्याने मजुरांची शहरांकडे भटकंती सुरु आहे.

Web Title:  Sillodchy thirst increased