Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 15:48 IST2021-04-27T15:42:16+5:302021-04-27T15:48:20+5:30
गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते.

Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर
औरंगाबाद: नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने जालना रोड पुनर्बांधणीच्या ४०० कोटींच्या मूळ प्रस्तावाला फाटा देत फक्त ७४ कोटींचा निधी दिला असून त्यातून जालना रोडच्या साईडड्रेनसह उड्डाणपुलांचे काम करण्यात येणार आहे. विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित असून तो पूल अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात बांधण्याची गरज आहे. यासाठी सोशल मीडियातून भाजपानेच विरोध सुरू केला आहे. त्यात शिवसेनेने उडी घेत विमानतळासमोरच पूल बांधणे गरजेचे असल्याचे सांगून आजवरच्या अपघाताचे दाखले सोशल मीडियातून दिले आहेत.
गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते. क्रांतीचौक येथील उड्डाणपुलाला जोडून मोंढा नाक्यापर्यंत नवीन पूल ‘लँड’ करण्याचा निर्णय झाला होता. परंतु अमरप्रीत चौकात पूल बांधणे शक्य नाही. तेथे अंडरग्राऊंडला जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. ते जाळे विस्कळीत झाल्यास ५० वसाहतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल. अमरप्रीत चौकात होणारा पूल तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित असेल की नाही, याबाबत एनएचएआयच्या यंत्रणेला साशंकता होती. त्यामुळे पूल पुन्हा विमानतळासमोरच बांधण्याचे निश्चित झाल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
विमानतळासमोरील पूल का केला होता रद्द
विमानतळासमोर जास्त वाहतूक नसते असा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिला होता. अमरप्रीत चौकात बीडबायपास, दर्गा रोडवरून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे पूल प्रस्तावित करण्याबाबत तत्कालीन प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी विभागीय बैठकीत सांगितले होते.
भाजपाचा विरोध असा
भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत देसरडा यांनी सोशल मीडियातून विमानतळासमोरील पुलाला विरोध केला आहे. वाहतुकीचा विचार करता अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात हा पूल बांधण्यात यावा. विमानतळासमोर पुलाची गरज नसून नागरिकांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकरणी देसरडा यांनी सांगितले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या पूल बांधणे शक्य आहे.
शिवसेनेने दिलेले उत्तर असे
शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी सोशल मीडियातूनच विमानतळापासून रामनगरपर्यंत किती अपघात झाले आहेत, वाहतूक किती आहे याचे दाखले दिले आहेत. केंद्रात सरकार भाजपाचे आहे, त्यामुळे भाजपाने शहरासाठी आणखी दोन पुलांसाठी निधी आणावा असे आव्हानही दिले आहे. विमानतळासमोरील पुलाचे लोकेशन आता पुन्हा बदलले तर या भागातील सर्व वॉर्डातील नागरिकांसह आंदोलन उभारण्याचा इशारा गांगवे यांनी दिला..