सात वर्षांत केवळ खोटी भाषणे अन आश्वासने; अशोक चव्हाण यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:41 IST2021-05-31T11:37:06+5:302021-05-31T11:41:02+5:30

सरकारची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी सर्व राज्यांशी संपर्क ठेवतात.

In seven years only false speeches and promises; Ashok Chavan's attack on Prime Minister Modi | सात वर्षांत केवळ खोटी भाषणे अन आश्वासने; अशोक चव्हाण यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सात वर्षांत केवळ खोटी भाषणे अन आश्वासने; अशोक चव्हाण यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ठळक मुद्देसत्तेत येण्यासाठी केवळ पोकळ भाषणे केली गेली, खोटी आश्वासने दिली गेली. आम्ही केवळ निवडणुकीपुरता शब्द दिला होता, तो जुमला होता, असेही सांगण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

औरंगाबाद : ‘सात वर्षांत केवळ खोटी भाषणे.. खोटी आश्वासने... यापलीकडे काहीही घडलेले नाही’, असा हल्लाबोल रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते ऑनलाइन पत्रपरिषदेत बोलत होते. इव्हेंट मॅनेजमेंट करून इतिहास घडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यांनी सांगितले की, या सरकारचे अभिनंदन करणे तर दूरच; पण सत्तेतील मंत्र्यांनाही एकमेकांना शुभेच्छा देता येतील, अशी परिस्थिती नाही. सत्तेत येण्यासाठी केवळ पोकळ भाषणे केली गेली, खोटी आश्वासने दिली गेली. आम्ही केवळ निवडणुकीपुरता शब्द दिला होता, तो जुमला होता, असेही सांगण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

राहुल गांधी यांनी चुका दाखवल्या; पण...
कोरोना महामारीचा मुकाबला करतानाही सरकारने कमालीचे दुर्लक्ष केले. राहुल गांधी यांनी चुका दाखवून दिल्या; पण त्याकडे दुर्लक्ष केले. सरकारला यातले गांभीर्य कळले नाही. जागतिक पातळीवर कोरोना दुर्लक्षाची दखल घेतली गेली. तरीही काही केले नाही, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

राइट मॅन इन द रॉंग पार्टी...
चव्हाण म्हणाले, सरकारची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी सर्व राज्यांशी संपर्क ठेवतात. महाराष्ट्रासाठी त्यांची तळमळ आहे; पण गडकरी म्हणजे राइट मॅन इन द राँग पार्टी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना मूर्ख बनविण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उचलण्यासाठी आरक्षण कायदा केला. पण हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही.

मेटेंच्या टीकेला फारसं महत्त्व देत नाही...
छत्रपती संभाजीराजेंनी सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते योग्य आहेत. बाळासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यातून आताच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. विनायक मेटे पुढची विधान परिषद आपल्याला मिळावी, यासाठी सातत्याने माध्यमांसमोर राहतात. राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर टीका केली तर काही फरक पडत नाही. हा भाजपचा अजेंडा आहे. मेटे यांच्या टीकेला मी फारसं महत्त्व देत नाही. असे चव्हाण यांनी नमूद केले.

विलासरावांच्या स्मारकासाठी मदत करणार...
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे औरंगाबादेत स्मारक व्हावे यासाठी समितीची स्थापना केली आहे. शिवाय औरंगाबादेतील शासकीय कर्करोग उपचार केंद्राला विलासरावांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे, याविषयी चव्हाण म्हणाले, की विलासरावांचे स्मारक झाले पाहिजे. कॅन्सर हॉस्पिटललाही विलासरावांचे नाव दिले पाहिजे. मी यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेन. संजय लाखे पाटील, विलास औताडे, डॉ.कल्याण काळे, हिशाम उस्मानी आदीही यावेळी उपस्थित होते.

Web Title: In seven years only false speeches and promises; Ashok Chavan's attack on Prime Minister Modi