सातारा- देवळाई नगर परिषद केव्हा?
By Admin | Updated: May 24, 2014 02:09 IST2014-05-24T01:50:35+5:302014-05-24T02:09:35+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा-देवळाई नगर परिषदेसाठी १९ आक्षेप दाखल झाले असून, त्याचे निराकरण झाल्यानंतरच नगर परिषदेला हिरवा कंदील मिळणार आहे,

सातारा- देवळाई नगर परिषद केव्हा?
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा-देवळाई नगर परिषदेसाठी १९ आक्षेप दाखल झाले असून, त्याचे निराकरण झाल्यानंतरच नगर परिषदेला हिरवा कंदील मिळणार आहे, असे असले तरी निवडणुकांमधील राजकीय हालचालींमुळे तसेच आक्षेपांचा निपटारा करण्यात प्रशासकीय विलंब होत असल्यामुळे नगर परिषद अस्तिवात येणार केव्हा असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभेची आचारसंहिता संपताच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे. किमान एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. आता नगर परिषद २०१५ मध्येच अस्तित्वात येईल, अशी धारणा सातारा -देवळाई परिसरातील नागरिकांत निर्माण झाली आहे. नगर परिषद येईल तेव्हा येईल; परंतु सफाई, पाणीटंचाई, वीज आदी प्रश्न सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. लेखी तक्रार देऊनही पदाधिकारी व अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. सातारा-देवळाई परिसराचा विस्तार पाहता ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर स्थिती गेल्याचे दिसते. नगर परिषदेत आमचाही समावेश असावा, आम्हाला का वगळण्यात आले इत्यादी विषय आहेत. या भागात बँका, शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये असून, उत्तम दर्जाची म्हणता येईल अशी एकही सुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही, म्हणून शासनाने सातारा-देवळाई परिसराला नगर परिषदेचा दर्जा देण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. त्यामुळे रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही. लवकरात लवकर नगर परिषदेचा विषय निकाली काढावा, अशी मागणी माजी सरपंच यशवंत कदम, वाल्मीक पाटील, विठ्ठल काळे आदींनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आक्षेपांवर प्रथम सुनावणी होणार आहे. त्यानंतर नगर परिषदेविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे या आक्षेपांच्या सर्व फाईल वर्ग केल्या असून, तीन जणांनी आपले आक्षेप परत घेतले असून, आता फक्त १९ आक्षेप शिल्लक आहेत.सातारा-देवळाई परिसरातील आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन लवकरच नोटिसा बजावणार असून, त्यावेळी सदरील तक्रारींवर सविस्तर चर्चा होऊन त्याचे समाधान केल्याशिवाय नगर परिषदेचा चेंडू टोलवणे शक्य नाही.