लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात रस्त्यासाठी शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपये दिले; परंतु त्यातून सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांसाठी एक दमडीही मिळाली नाही. त्यामुळे येथील नागरिकांची अवस्था ‘माझा कुणा म्हणू मी’सारखी झाली आहे.सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकाम परवानगीसाठी सिडकोकडे कररूपात जमा झालेला साडेआठ कोटींचा निधीदेखील मनपाला वर्ग करण्यात आला. त्यातून काही थातुरमातुर कामे उरकण्यात आली; परंतु पाऊण लाखावर नागरिक राहत असलेल्या या परिसरात मागील दीड वर्षात मनपाने स्वनिधीतून अद्याप एकही काम सुरू केलेले नाही. शासनाकडून मिळणाºया १०० कोटींच्या निधीतील वाटा सातारा- देवळाईच्या वाट्याला आला नाही. येथील किमान आठ रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारून जनतेच्या रहदारीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.महानुभाव आश्रम चौक ते देवळाईपर्यंत बायपास रोडवर दुतर्फा निवासी वसाहती वसल्या आहेत. यापैकी एकाही वसाहतीला चांगला रस्ता नाही. एका वॉर्डात सत्ताधारी पक्ष भाजपचा नगरसेवक, तर दुसºया वॉर्डात काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यांनीही सातारा-देवळाईला निधी देऊन रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न सोडविण्यासाठी १०० कोटींतून विकासकामांची मागणी केली. मात्र, दोन्ही वॉर्डांच्या पदरात काही पडण्याची शक्यता आता मावळली आहे. सातारा- देवळाईच्या रहिवाशांकडून अतिविकसित भागातील मालमत्तेला लागतो तेवढा कर वसूल केला जाणार आहे; परंतु सेवा-सुविधा देण्यावर महानगरपालिकेने हात आखडता घेतला आहे. असा रोष नागरिकांतून व्यक्त होतो आहे.
१०० कोटी रुपयांतून सातारा-देवळाई वॉर्डांना दमडीही नाही मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:13 AM