२० मिनिटांत आढाव्याचा ‘उद्योग’

By Admin | Updated: August 20, 2015 00:24 IST2015-08-20T00:24:12+5:302015-08-20T00:24:12+5:30

बीड : येथील औद्योगिक वसाहतीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने उद्योजकांना वेळच दिला नाही.

Review 'industry' in 20 minutes | २० मिनिटांत आढाव्याचा ‘उद्योग’

२० मिनिटांत आढाव्याचा ‘उद्योग’


बीड : येथील औद्योगिक वसाहतीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने उद्योजकांना वेळच दिला नाही. केवळ २० मिनीटात घाईघाईने ‘अंदाज’ घेऊन समिती निघून गेली. दिलेल्या वेळेतही उद्योजक मात्र पाणी, वीज आदी सुविधा मिळत नसल्याने आक्रमक झाले होते. विशेष म्हणजे या समितीतील तब्बल २२ आमदारांनी दांडी मारली.
आ. अर्जूनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य असलेले मा.आ.मिलिंद माने, आ.शशीकांत खेडेकर, आ.चरण वाघमारे, स्थानिक आमदार अमरसिंह पंडित यांचा समावेश होता. औद्योगिक विभागाशी संबंधित अर्धा डझन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही समितीची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, युवा सेनेचे सुशील पिंगळे उपस्थित होते.
उद्योजक उल्हास संचेती यांनी एमआयडसीतील समस्यांचा पाढाच समितीपुढे वाचून दाखविला. परंतु या समस्या मांडत असताना समितीने घाई करत त्यांना थांबविले. परंतु पुन्हा सुरेश देशमुख या उद्योजकाने माईकचा ताबा घेत कैफियत मांडली.
त्यानंतर आ.अमरसिंह पंडीत यांनी मुद्दे मांडले. राज्यात इतर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाण्याचे दर १५ रूपये लिटर प्रमाणे आहेत, परंतु बीडमध्ये हेच दर दुपटीने आहेत. मग अशा परिस्थितीत उद्योजक कसे पुढे येतील. नवीन उद्योग कसे उभा राहतील असा सवाल उपस्थित केला. उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी मागे खेचले जात आहे. आणि असे नियमीत चालू राहिले तर उद्योजक आंदोलन उभारतील आणि त्यांना आवरणे अवघड बनेल असे सांगून त्यांनी पाणी व वीज उपलब्ध करून दर कमी करण्याची सूचना केली. याठिकाणच्या उद्योगांना सुविधा मिळाल्या तर उद्योग वाढतील आणि सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असेही आ.पंडीत म्हणाले.
उद्योजक ताटकळले
अंदाज समिती बीडमध्ये येण्याची वेळ दुपारी तीन वाजण्याची निश्चीत केली होती. परंतु अंदाज समितीने तब्बल तीन तास उशिराने बीडमध्ये आपले आगमन केले. दुपारी तीन ते सायं. सहा वाजेपर्यंत उद्योजक एमआयडीसीत समितीची चातकाप्रमाणे वाट पहात होते. अधिकाऱ्यांची तर नियोजन करण्यातच तारांबळ उडाल्याचे दिसले.
समस्या जाणून घेण्यासाठी वेळ द्या
उद्योजकांच्या समस्या भरपूर आहेत, दिवसभर सांगितले तरी त्या संपणाऱ्या नाहीत, परंतु वीज, पाणी, रस्ते, नाल्या यासारख्या विषयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थोडा वेळ दिला तर आम्ही त्या मांडू शकू. एवढ्या वेळेत आम्ही काय सांगणार? जे लोक यापूर्वी आढावा घेऊन गेले, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सबसिडी देण्याचे मार्ग चुकीची आहेत, यामुळे उद्योजक पुढे येत नाही, आणि उद्योग कमी होत चालल्याचे उद्योजकांनी समितीला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Review 'industry' in 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.