आॅनलाईननंतरही रांग लावावीच लागणार
By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:44:46+5:302014-09-04T00:54:22+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात येऊन अर्ज भरण्याचा हेलपाटा कमी व्हावा, यासाठी आॅनलाईन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे;

आॅनलाईननंतरही रांग लावावीच लागणार
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात येऊन अर्ज भरण्याचा हेलपाटा कमी व्हावा, यासाठी आॅनलाईन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे; परंतु आॅनलाईन अर्ज केल्यानंतरही पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आॅनलाईन अर्जाची प्रिंट, आवश्यक ती मूळ कागदपत्रे, झेरॉक्स प्रती घेऊन आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावेच लागणार आहे, त्यामुळे या सुविधेमुळे लर्निंग लायसन्ससाठी केवळ चाचणी देण्यासाठी तारीख निश्चित करता येत असल्याने वाहनधारकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाने १ सप्टेंबरपासून आॅनलाईन अपॉइंटमेंटची सुविधा सुरू केली आहे. यामधून लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) मिळविण्यासाठी वाहनधारकांना आता आॅनलाईन अर्जाची मुभा देण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे.
आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसेन्स, परमनंट लायसेन्स असो की, अन्य काही कामे; स्वत:च करताना वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
त्यामुळे नाइलाजाने वाहनधारकांना लर्निंग लायसन्ससह अनेक कामांसाठी एजंटकडे जाण्याची वेळ येते. शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आल्यानंतर या सगळ्यापासून सुटका होईल, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
इंटरनेटची सुविधा असणाऱ्या कोणत्याही ठिकाणाहून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अर्जदारांना आता इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
वेळप्रसंगी दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अर्जदारांना संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन आवश्यक ती माहिती भरावी लागेल. यानंतर चाचणीसाठी पूर्ववेळ निश्चित करावी लागेल आणि त्या दिवशी आरटीओ कार्यालयात हजर राहावे लागेल.
आजपासून आॅनलाईनची सक्ती
लर्निंग लायसन्ससाठी गुरुवारपासून आॅनलाईन अर्जाची सक्ती केली जाणार आहे. असे असताना बुधवारी काही जणांना आॅनलाईन अर्जासाठी परत पाठविण्यात आले, तर काही जणांची आॅनलाईन अर्जाशिवाय चाचणी घेण्यात आली.
आॅनलाईन अर्ज भरण्यामध्ये काही अर्जदारांना अडचणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.