परभणी-मनमाड दुहेरीकरणाला उजाडणार २०२२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:00 IST2018-12-13T00:00:51+5:302018-12-13T00:00:58+5:30
वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षांत दुहेरीकरण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याचे स्पष्ट आहे.

परभणी-मनमाड दुहेरीकरणाला उजाडणार २०२२
औरंगाबाद : वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षांत दुहेरीकरण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याचे स्पष्ट आहे.
वार्षिक निरीक्षणानिमित्त बुधवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा उपस्थित होते. विनोदकुमार यादव म्हणाले, परभणी ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम मार्च, एप्रिल-२०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्याबरोबर नांदेड विभागाचे दोन वर्षात पूर्ण केले जाईल. यासाठी सर्वेक्षण झालेले आहे. यामध्ये मनमाड ते दौंड मार्गासाठी निविदा निघालेली आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेची गती वाढेल, थांबे वाढविता येतील, नवीन रेल्वे सुरू करता येईल, असे ते म्हणाले.
विनोदकुमार यादव यांनी रेल्वे प्रवाशांबरोबर संवाद साधला. तेव्हा रेल्वे मनमाडला खूप वेळ थांबत असल्याची तक्रार एका प्रवाशाने केली. रेल्वेस्टेशनवरील कँटिनमध्ये खाद्यपदार्थांची तपासणी केली तेव्हा खाद्यपदार्थ दिल्याची वेळ नमूद करण्याची सूचना यादव यांनी केली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप साबळे यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्याची अवस्था दाखविली. रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी, राजकुमार सोमाणी, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, ‘मसिआ’चे राहुल मोगले, अनंत बोरकर, गौतम नहाटा, रेल्वेस्टेशनवरील कुलींनी महाव्यवस्थापकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
एकेरी मार्गाने अडचण
परभणी-मनमाड दुहेरीकरणाविषयी बोलताना विनोदकुमार म्हणाले, यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नियोजन केले जाईल. मनमाड ते परभणी यादरम्यान सध्या एकेरी लोहमार्ग आहे. या लोहमार्गावर डिझेल इंजिनद्वारे रेल्वेची वाहतूक केली जात आहे. इंजिन नादुरुस्त झाल्यास पूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. शिवाय नवीन रेल्वे सुरू करण्यासही अडचण आहे. दुहेरीकरणाला आणखी किमान तीन वर्षे लागणार असल्याने ही गैरसोय कायम राहणार आहे.
कधीही धावेल राज्यराणी एक्स्प्रेस
मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला आठ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. परंतु मनमाड येथील लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केल्याने रेल्वे सुरूहोणे रेंगाळले. परंतु आता मनमाड येथील लोक तयार झाले आहेत. त्यामुळे ही रेल्वे कधीही धावू शकेल, असे विनोदकुमार यादव म्हणाले. नांदेड-मुंबई रेल्वेला मनमाडपर्यंत आठ बोगी असतील. त्यानंतर या रेल्वेच्या बोगी राज्यराणी एक्स्प्रेसला जोडून मुंबईपर्यंतचा प्रवास होईल, असे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी एक रेल्वे मिळेल.
पीटलाईन जागेशिवाय अशक्य
पीटलाईनविषयी महाव्यवस्थापक म्हणाले, पीटलाईनचा विषय न्यायालयात आहे. औरंगाबादला पीटलाईन व्हावी, अशी आमचीही इच्छा होती. परंतु येथे जागा मिळाली नाही. २८ बोगींची पीटलाईन बनवावी लागते. त्यादृष्टी सुविधा देण्यासाठी जागा लागते. परंतु जागा मिळाली नाही. हे सगळे जागा मिळाली तर शक्य आहे. परंतु ही जागा मिळणे अशक्य आहे.
प्रत्येक एक्स्प्रेसला थांबा अशक्य
वार्षिक निरीक्षणातून सुरक्षा आणि मागण्या प्राधान्याने पाहिल्या जातात. एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा देण्याची मागणी होते. परंतु प्रत्येक एक्स्प्रेसला थांबा दिला तर लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होते, असे यादव म्हणाले. यावर ओमप्रकाश वर्मा यांनी महाव्यवस्थापकांसमोर हात जोडून किमान तपोवन एक्स्प्रेसला मुकुंदवाडीवर थांबा देण्याची मागणी केली. तेव्हा जागेवरून उठत यादव यांनी वर्मांशी संवाद साधला. तेव्हा वर्मा यांनी जोरात संवाद साधला. त्यावर या मागणीसाठी प्रत्येक जण अशाच आवाजात बोलत असल्याचे यादव म्हणाले.