आमचे ‘सौभाग्य’ कधी उजळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:09 AM2018-12-28T00:09:56+5:302018-12-28T00:10:21+5:30

महावितरणचे दुर्लक्ष : ५० वर्षांपासून येथे वीज पोहोचलीच नाही

 Our 'good luck' will ever be lit? | आमचे ‘सौभाग्य’ कधी उजळणार?

आमचे ‘सौभाग्य’ कधी उजळणार?

googlenewsNext

कैलास पांढरे
केºहाळा : सिल्लोड तालुक्यातील के-हाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसून, मागणी करूनही वीजपुरवठा मिळत नसल्याने या शेतवस्तीवर अंधारच आहे. ‘गाव तेथे एस.टी.’ याप्रमाणे महावितरण कंपनीचे ‘गाव तेथे वीज’ हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. महावितरणच्या सौभाग्य योजनेतूनही येथे वीज आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. विजेअभावी या शेतवस्तीचे जीवन ‘अंधकारमय’ झाले आहे.
के-हाळा येथील गट नंबर १५३, १५५ व १५७ या हरण बर्डी शिवारात वीज नसल्याने येथील लोक आदिमानवासारखे जीवन जगत आहेत. गट नं. १५५ मधील नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. येथील अनेक शिवारातही ५० वर्षांपासून ‘उजेड’ पडलेला नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये महावितरणकडे कोटेशनही भरले आहे; पण महावितरण कंपनीने त्याची दखल घेतलेली नाही. सौभाग्य योजनेंतर्गत तरी आमचे भाग्य बदलेल का, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
मोबाईल चार्चिंगसाठी मोजावे लागतात दररोज पाच रुपये
या शेतवस्तीवरील कुटुंबांतील सदस्यांपैकी फक्त घरातील एकाच प्रमुख सदस्याकडे साधा मोबाईल आहे. तोही चालू ठेवायचा असल्यास रोज गावातील मोबाईल दुकानदाराकडे चार्जिंग करण्यासाठी पाच रुपये मोजावे लागतात.
ज्ञानार्जन अंधारात
या परिवारातील अनेक मुले-मुली प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असून, वीज नसल्याने त्यांना अंधारातच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. हे विद्यार्थी गावातील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत व इतर शाळेत शिक्षण घेतात. शाळेची वेळ सकाळी ९ ते ४ आहे. गावापासून शेत दोन किलोमीटर अंतरावर आहे. वेळेत शाळेत पोहोचायचे ठरल्यास या चिमुकल्यांना सकाळीच सात ते आठ वाजताच निघावे लागते व चार वाजेला शाळा सुटल्यावर किमान पाच ते सहापर्यंत आपल्या घरी पोहोचतात. शाळा सुटल्यावर घरी पोहोचून जेवण करेपर्यंत अंधार होतो. परिणामी, अभ्यास करता येत नसल्याने या विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली आहे.
महिलांना वेळेतच करावा लागतो स्वयंपाक
कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते बाजूला ठेऊन या महिलांना सायंकाळी सूर्य मावळण्याअगोदरच व सकाळी सूर्योदयानंतर वेळेच्या आत स्वयंपाक करून ठेवावा लागतो.
वीज नसल्याने शेतकºयांना शेतात मळणीयंत्रही आणता येत नाही. परिणामी, शेतातील पिकवलेला माल दुसरीकडे बैलगाडीच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करून मळणीसाठी न्यावा लागतो.
कोट...
एक पिढी संपायली आली...
मी २० नोव्हेंबर २०१० रोजी महावितरणकडे कोटेशन भरले आहे; परंतु आजपर्यंत दखल घेतली गेलेली नाही. आमच्या घरात लाईटचा उजेड अजूनही पडला नाही. एक पिढी निघून जायची वेळ आली तरी आमच्या घरात ‘उजेड’ पडला नाही.
-शेख हुसेन शेख मोहंमद (वय ७५)
मी गट नंबर ५५ मध्ये मागील ५०-६० वर्षांपासून राहत आहे; परंतु आमच्या घरात अजूनही लाईट लागला नाही. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो.
-नाथाजी फकिरा सुरडकर (वय ८५)
मी माझ्या वडिलांच्या काळापासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. माझी दुसरी पिढी निघून गेली. आज माझे वय ६५ आहे; पण मला वीज दिसली नाही. यामुळे आमच्या घरी पाहुणे येण्यास टाळाटाळ करतात.
-सुखदेव रामराव बनकर (वय ६५)
दोन महिन्यांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भुसावळकडे जात असताना त्यांनी सिल्लोड येथे महावितरण कर्मचारी व ग्राहकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. यावर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाºयांना दखल घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी दोन दिवसांत काम करून देतो म्हणणारे अधिकारी अजूनही येथे आले नाहीत. जर ऊर्जामंत्र्यांचेच काही चालत नसेल तर आमच्यासारख्या गोरगरिबांची कोण दखल घेणार, अशी खंत या शेतकºयांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

Web Title:  Our 'good luck' will ever be lit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.