दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:02 IST2026-03-06T14:59:38+5:302026-03-06T15:02:54+5:30
२७ फेब्रुवारी ते ३ मार्च: दुबईत काय घडलं? खासदार कल्याण काळेंनी सांगितली आबूधाबीतील स्फोटांची भीषणता

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी
छत्रपती संभाजीनगर: मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाचा भीषण अनुभव छत्रपती संभाजीनगरचे खासदार कल्याण काळे यांना आला आहे. कुटुंबासह दुबई दौऱ्यावर असताना युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तीन ते चार दिवस तेथेच अडकून पडावे लागले होते. अखेर ते सुखरूप मायदेशी परतले असून त्यांनी आपला हा थरारक अनुभव प्रसारमाध्यमांशी शेअर केला.
डोळ्यासमोर मिसाईल हल्ले आणि स्फोट
खासदार काळे २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह दुबईला गेले होते. २८ तारखेला पोहोचल्यानंतर काही तासांतच आबूधाबी परिसरात मिसाईल हल्ले आणि स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे दुबई विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आणि शेकडो प्रवासी तेथेच अडकून पडले. "काही दिवस विमानतळ बंद असल्याने आम्हाला तेथेच थांबावे लागले, भीतीचे वातावरण होते," अशी माहिती काळे यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी
या संकटकाळात देशवासियांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मनोबल वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर भारतीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. "युद्धामुळे निरपराध लोकांचे बळी जातात, जगात शांतता असणे आवश्यक आहे," असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.