सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST2025-06-05T18:44:54+5:302025-06-05T18:45:17+5:30

ऑडिटनंतर प्रशासनाला जाग, ४६४ जणांकडून वसूल केले ३९ लाख; २ हजार लाभार्थ्यांची साधली चुप्पी

More than once subsidy given to 2399 farmers in Chhatrapati Sambhajinagar | सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

- प्रवीण जंजाळ
कन्नड :
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत २०२२-२३ मध्ये महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली असून, आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे जमा केले असून, १ हजार ९३१ शेतकऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत अनुदान परतीकडे दुर्लक्ष केले आहे.

राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या निकषानुसार अनुदान देण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या वर्षात शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान दिले होते. सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर शेतकऱ्यांनी उचलून खर्चही केली. याबाबत केलेल्या लेखा परीक्षणात जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच ज्या बँकेतून संबंधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले त्या बँकांनाही पत्र देण्यात आले. त्यानंतर ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे युपीआय व आरटीजीएसद्वारे जमा केले. १ हजार ९३१ शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी पैसे परत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करावेत तरी कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

३१२ शेतकऱ्यांकडून अधिकची वसुली
दरम्यान, जिल्ह्यातील ३१२ शेतकऱ्यांकडून अधिकचे अनुदान वसूल करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडून महसूल विभाग आणि बँका या दोन्ही यंत्रणांनी पैसे वसूल केले. आता हे शेतकरी एक रक्कम परत मागण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

कन्नड तालुक्यात सर्वाधिक वसुली
कन्नड तालुक्यात सन २०२२-२३मध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतील पीक नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले होते. यापैकी ६१६ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा पीक नुकसानीचे अनुदान वाटप झाले होते. त्यापैकी ३१२ शेतकऱ्यांकडून २४ लाख २० हजार ७६२ रुपये वसूल करण्यात आले असून, हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

दोन वेळा अनुदान घेतलेले जिल्ह्यातील शेतकरी असे
कन्नड तालुका- ६१६ पैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे जमा केले
गंगापूर - ७पैकी ३ शेतकऱ्यांनी १७ हजार ८५० रुपये जमा केले
पैठण - १८पैकी एकाही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.
फुलंब्री - २०पैकी १४ शेतकऱ्यांनी ८३ हजार ४८७ रुपये परत केले.
सिल्लोड - ६१०पैकी १३५ शेतकऱ्यांनी १४ लाख ५७ हजार ६१४ रुपये जमा केले.
सोयगाव- ५३पैकी ४ शेतकऱ्यांनी १० हजार ३३६ रुपये परत केले.
वैजापूर - ७९०पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.
छत्रपती संभाजीनगर - २८५पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.
खुलताबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अधिकचे अनुदान मिळाले नाही.

रक्कम परत घेतली
सॉप्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पेक्षा अधिक वेळा रक्कम गेली होती. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने ९० टक्केंच्यावर रक्कम शासन खात्यात जमा झाली आहे.
- विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड

Web Title: More than once subsidy given to 2399 farmers in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.