पैसे आले, वाटायचे कोणाला ?
By Admin | Updated: January 13, 2015 00:11 IST2015-01-12T23:56:48+5:302015-01-13T00:11:39+5:30
संजय कुलकर्णी , जालना खरीप हंगाम २०१४ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमवारी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे १२३ कोटी ३६ लाखांचा निधी प्राप्त झाला.

पैसे आले, वाटायचे कोणाला ?
संजय कुलकर्णी , जालना
खरीप हंगाम २०१४ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमवारी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे १२३ कोटी ३६ लाखांचा निधी प्राप्त झाला. मात्र तो कुठल्या किती शेतकऱ्यांना किती वाटप करायचा, याची आकडेवारीच नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
२०१४ मध्ये खरीप हंगामात अपेक्षित पाऊस न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक नष्ट झाले. शेतात घातलेले पैसेही निघाले नाहीत. प्राथमिक, सुधारित आणि अंतिम आणेवारीनंतर केंद्राचे एक पथक जिल्ह्याचा दौरा करून गेले. त्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ९७१ गावांची यादी जाहीर करण्यात आली.
या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून ही मदत दिली जात असल्याचे शासन निर्णयात म्हटलेले आहे. शेतकऱ्यांना प्रारंभी ४० टक्के रक्कम दिल्यानंतर उर्वरीत रक्कम देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गेल्या एक-दीड महिन्यांपासून दुष्काळाची चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९६.६५ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दिला. त्यापैकी ४० टक्के म्हणजे १२३.३६ कोटींची मदत मिळाली. बाधित गावातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर महसूल यंत्रणेमार्फत विभागीय आयुक्तांकडून या अनुदानाच्या आदेशास मान्यता मिळाली.
सदरील प्राप्त अनुदान बाधित गावातील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्याकरीता जिल्ह्यातील आठही तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले असून अनुदान वितरणाच्या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडे गावातील शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक सादर करावे, असे आदेशही जिल्हाधिकारी नायक यांनी दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार, याची आकडेवारी प्रशासनाकडे नाही. ४० टक्के निधी आला, तो कशाप्रकारे वाटप करणार, याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. कृषी विकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यापैकी कुठल्याही अधिकाऱ्याला यासंदर्भात समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे मिळालेले १२३ कोटी ३६ लाख रूपये शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासाठी बराच वेळ जाणार, हे निश्चित आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याशी संपर्क साधला असता किती शेतकऱ्यांना तो वाटप केला जाणार, किंवा किती शेतकऱ्यांसाठी निधी प्रस्तावित केला, याची आकडेवारी नसल्याचे ते म्हणाले.
४जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी उमेश घाडगे म्हणाले की, हा विषय माझ्याकडे नाही, त्याविषयी जि.प. कृषी विकास अधिकारी गंजेवार यांच्याकडे माहिती मिळेल.
जि.प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनाही दुष्काळग्रस्तांच्या आकडेवारीबाबत विचारणा केली. त्यांनीही याबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पैसे कोणाला वाटणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.