मोबाइलमुळे स्मार्ट ग्राहकांचे पाकीट होतेय कॅशलेश; तरीही वाढली एटीएमची संख्या
By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 8, 2023 18:38 IST2023-09-08T18:36:11+5:302023-09-08T18:38:19+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६६ हजार १०० कोटींचे डिजिटल व्यवहार

मोबाइलमुळे स्मार्ट ग्राहकांचे पाकीट होतेय कॅशलेश; तरीही वाढली एटीएमची संख्या
छत्रपती संभाजीनगर : भाजी खरेदी केली की ग्राहक लगेच खिशातून मोबाइल बाहेर काढतात आणि ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून व्यवहार पूर्ण केला जातो. यामुळे रोख व्यवहाराची संख्या घटली आणि डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढू लागली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी ६६ हजार १०० कोटींचे डिजिटल व्यवहार केले. हे मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांनी जास्त आहेत. मोबाइलमुळे स्मार्ट ग्राहकांचे पाकीट ‘कॅशलेस’ होत आहे. दुसरीकडे एटीएमवरील गर्दी ओसरत असताना बँका मात्र एटीएमची संख्या वाढवत आहेत, हे विशेष.
नऊ कोटी ट्रँझेक्शन
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत ६६ हजार १०० कोटींची डिजिटल उलाढाल झाली. ही उलाढाल ९ कोटी ५३ लाख ट्रँझेक्शनमधून झाली.
मागील वर्षी ४३ हजार ७२२ कोटींचे डिजिटल व्यवहार
मागील आर्थिक वर्षात एप्रिल-जून २०२२ या तिमाहीत जिल्ह्यात ५ कोटी २ लाख डिजिटल ट्रँझेक्शन झाली आणि ४३ हजार ७२२ कोटींचे डिजिटल व्यवहार झाले. या तुलनेत एप्रिल-जून २०२३ ट्रँझेक्शन ९० टक्क्यांनी वाढली, तर ५१ टक्क्यांनी डिजिटल व्यवहार वाढले.
२९ नवीन एटीएमची भर
मागील वर्षी २०२२ मध्ये जिल्ह्यात सर्व बँकांची मिळून ६६२ एटीएम होती. तर चालू आर्थिक वर्षात यात नवीन २९ एटीएमची भर पडली आहे. सध्या ६९१ एटीएम कार्यरत आहेत.
सावधगिरी बाळगा
रोख न बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे, तसतशी डिजिटल व्यवहारात क्रांती घडत आहे. पण डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. पासवर्ड व लॉगिन आयडी कोणालाही देऊ नका. फसवणूक झाली तर ३ दिवसांत बँक किंवा आरबीआयकडे तक्रार करा. तुमची चूक नसेल व फ्रॉड असेल तर ७ दिवसांच्या आता रक्कम खात्यात परत येऊ शकते.
- मंगेश केदार, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक
कोणत्या माध्यमातून डिजिटल व्यवहार ?
माध्यम (एप्रिल-जून २०२३)
१) यूपीआय- -१३ हजार २४४ कोटी रु.
२) भारत क्यूआर कोड- १३२ कोटी रु.
३) डेबिट, क्रेडिट कार्ड- २० हजार कोटी रु.
४) आयएमपीएस--२७ हजार ९०० कोटी रु.