वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर
By Admin | Updated: August 20, 2015 00:16 IST2015-08-20T00:16:22+5:302015-08-20T00:16:22+5:30
बीड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अॅड. अजय तांदळे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करत ते अध्यक्षपदी विराजमान झाले

वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर
बीड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अॅड. अजय तांदळे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करत ते अध्यक्षपदी विराजमान झाले. वकिल संघाचे अध्यक्ष होणे एवढेच आपले स्वप्न नसून वकिलांच्या वर्षानुवर्षापासून कायम असलेल्या समस्या निकाली काढण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. अजय तांदळे यांनी ‘लोकमत’शी दिलेल्या मुलाखतीतून केला.
बीड येथील जिल्हा न्यायालयात वकीलांना बसण्यासाठी जागेची समस्या आहे. जो पर्यंत नवीन इमारत होत नाही तो पर्यंत हा प्रश्न कायम राहणार असल्याचे माहीत असल्याने अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालकमंत्री पंकजा पालवे यांची भेट घेतली. नवीन इमारतीचे कामे वेगाने व मुदतीच्या आत व्हावे यासाठी संबंधीत विभागास सूचना देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. हे काम वेगाने झाल्यास इतरत्र चालणारे न्यायालये एकाजागी चालवली जातील, हा त्याचा दुसरा फायदा होईल. तहसीलच्या मागे ग्राहक न्यायालयासाठी ४ हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध आहे. सदरच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत, परंतु ८४ लाख रुपयांचे वाढीव नवीन अंदाजपत्रक तयार केले असून त्याला मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले असल्याचे अॅड. तांदळे म्हणाले.
महिला वकीलांसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, सन २००४ मध्ये वकील संघात सचिव पदावर काम केले असल्याने वकीलांच्या अडचणी जाणून असल्याचे अॅड. तांदळे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ग्राहक भांडाराच्या माध्यमातून तिकीट, बाँड, स्टेशनरीची विक्रीकरुन वकील संघास उत्पन्न मिळवून देण्यात येणार आहे. ई-लायब्ररी मध्ये पुस्तकांची संख्या वाढविण्यात येतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, सर्व विधिज्ञ आणि न्यायालयीन अधिकारी (बार अॅन्ड बेंच) यांच्यातील संबंध खेळीमेळी, मोकळेपणाचे व सलोख्याचे राहतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दर महिन्याला सर्व साधारण सभेची बैठक घेणार असल्यचेही अध्यक्ष अॅड. तांदळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सर्व न्यायालयांमध्ये प्रकरणे वाढली असल्याने ते आपसी समझोत्याने सोडवली जाण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमास सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे मागील काळात समोर आले आहे. या वर्षी आयोजित होणाऱ्या लोक अदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अॅड. तांदळे म्हणाले. याचा लाभ सर्व सामान्य पक्षकारांना होईल यात शंका नाही. आगामी काळात लोक अदालतीत जिल्हा वकील संघाचा मोठा सहभाग राहील, असेही अॅड. तांदळे म्हणाले.