शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 15:06 IST2022-02-21T15:03:39+5:302022-02-21T15:06:00+5:30
मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद : प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यास आमच्या काळात पैसे मिळत होते. आता मात्र शेतकऱ्यांवर कोणी बोलत नाही, त्यांची वीज कापली जाते. रोज उठून पोपटपंची करायची, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे ? राज्य सरकार मुंबईतील उंच इमारतीत दलाली करण्यात हरवले आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज लासूर येथे केली.
लासुर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते १२० कोटींच्या विकास कामांचा उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या मेळाव्यात महिला बचत गट आणि दिव्यांग कामगारांना मदत देण्यात आली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मोदी सरकारने गोरगरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाण साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. ते म्हणाले, खूप दिल असे म्हणाऱ्यांच्या फक्त भाषणात मराठवाडा आहे, ते फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा या सरकारनें खून केला, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते, शेतकरी हताश होता, तेव्हा आम्ही मराठवाडा ग्रीड पाणी योजना आणली. समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो, मात्र या सरकारने 'स्लो पॉयझन' देऊन ती योजना संपवली. औरंगाबादने शिवसेनेला ओळख दिली, या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती, मात्र सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधं पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी खरमरीत टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली.
राज्य सरकार दलाली करण्यात व्यस्त
मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या मात्र या सरकारने एक पैशांची मदत केली नाही... आता सरकार कुठं आहे कळत नाही मुंबईच्या मोठ्या इमारतीत , तिथल्या दलाली करण्यात सरकार हरवलं आहे... याना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एका शेतकऱ्याची सुद्धा वीज कापली नाही. मात्र यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि दुसरीकडे सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते.