जायकवाडीत मोठी आवक सुरू
By Admin | Updated: September 10, 2014 00:51 IST2014-09-10T00:19:42+5:302014-09-10T00:51:38+5:30
पैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वरील धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला

जायकवाडीत मोठी आवक सुरू
पैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वरील धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला असून, हे पाणी मंगळवारी मध्यरात्री धरणात दाखल होणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. मंगळवारी धरणात २२0५0 क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत असून, ३७ टक्के जलसाठा झाला आहे.
गेल्या २४ तासांत नाशिकला जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे गोदावरीस महापूर आला आहे. सोमवारी नाशिक परिसरातील नाशिक ३३ मि. मी., गंगापूर २०० मि. मी., दारणा ६२ मि. मी. असा मुसळधार पाऊस झाला. नाशिक जलसंपदा विभागाने गंगापूर, दारणा व नांदूर मधमेश्वरमध्ये पाणी साठविण्यासाठी पाणी सोडून पॉकेट तयार करून ठेवले असल्याने तेथून नियंत्रित विसर्ग करण्यात येत आहे.
नांदूर मधमेश्वरमधून २६८५३, गंगापूर ४७९८, दारणा ६४७0, मुळा १०००, नीळवंडे ३३६५, ओझर वेअर ३0८८ व भंडारदरा ४३९२ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वर ते जायकवाडी १५४ कि. मी. अंतर असून, तेथून सुटलेले पाणी येण्यासाठी २६ तासांचा अवधी लागतो.
हे पाणी मंगळवारी मध्यरात्रीनंतर धरणात दाखल होण्यास प्रारंभ होईल, असे धरण नियंत्रण कक्षातून अभियांत्रिकी सहायक शेख अस्लम यांनी सांगितले.
जायकवाडीवरील धरणात मुळा ९१.३५ टक्के, भंडारदरा १०० टक्के, दारणा ९७.५५ टक्के, गंगापूर ९४ टक्के, करंजवन ८८.४७ टक्के, ओझर वेअर ८३ टक्के, नांदूर मधमेश्वर ७९.३७ टक्के असा जलसाठा झाला आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी मंगळवारी १५0७.९३ फूट इतकी झाली असून, धरणात एकूण जलसाठा १५३८.५३0 द.ल.घ. मी. झाला आहे. या पैकी उपयुक्त जलसाठा ८00.४२४ द. ल. घ.मी. झाला आहे. (वार्ताहर)