ऐतिहासिक ठेवा! महाराजा जसवंतसिंह ३५० वर्षांपूर्वी पूजा करत असलेल्या श्रीरामाची मूर्ती सुरक्षित
By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 26, 2026 19:14 IST2026-03-26T19:09:46+5:302026-03-26T19:14:34+5:30
छत्रपती संभाजीनगर ते जोधपूर कनेक्शन! किराडपुरा भागात जतन केलाय १५ व्या शतकातील रामलल्लाचा वारसा

ऐतिहासिक ठेवा! महाराजा जसवंतसिंह ३५० वर्षांपूर्वी पूजा करत असलेल्या श्रीरामाची मूर्ती सुरक्षित
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या छत्रपती संभाजीनगरात आजही अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्यांचा इतिहास थक्क करणारा आहे. असाच एक अनमोल आणि आध्यात्मिक ठेवा शहरातील किराडपुरा भागात जतन करून ठेवण्यात आला आहे. तब्बल ३५० वर्षांपूर्वीच्या या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या प्राचीन मूर्ती आजही येथील श्रीराम मंदिरात सुरक्षित असून, त्यांचा इतिहास थेट राजस्थानच्या राजघराण्याशी जोडलेला आहे.
महाराजा जसवंतसिंहांचे श्रद्धास्थान
इतिहासाच्या नोंदीनुसार १६६२ ते १६६५ या कालखंडात जोधपूरचे पराक्रमी महाराजा जसवंतसिंह हे छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) मधील याच परिसरात वास्तव्यास होते. त्या काळात त्यांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे एक भव्य मंदिर उभारले होते. विशेष म्हणजे, हे मूळ मंदिर पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार करण्यात आले होते. महाराजा जसवंतसिंह स्वतः या मंदिरात येऊन या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करत असत.
दीड- दोन फुटाच्या पंचधातूच्या मूर्ती
या मूर्तींचे ऐतिहासिक महत्त्व केवळ मौखिक ज्ञान परंपरेवर अवलंबून नाही, तर पुरातत्त्व विभागाकडेही या मूर्ती १५ व्या शतकातील असल्याच्या नोंदी आहेत. काळाच्या ओघात मंदिराच्या मूळ लाकडी संरचनेत बदल झाले असले, तरी मंदिर ट्रस्टने या मौल्यवान मूर्तींचे जतन केले आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, गरुडराज या मूर्ती पंचधातूंच्या असून, दीड ते दोन फुटांच्या आहेत.
३८ वर्षांपासून मंदिराचा कारभार ट्रस्टकडे
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या ऐतिहासिक मंदिराची जबाबदारी सुरुवातीला महाराष्ट्र शासनाकडे होती. त्यानंतर १९८८ मध्ये सरकारने या मंदिराची व्यवस्था श्रीरामचंद्र मंदिर (मठ) ट्रस्टकडे सोपवली. माजी खासदार बाळासाहेब पवार हे या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांच्यासोबत लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, बाळासाहेब श्रीमंत, मोरेश्वर सावे यांसारख्या मान्यवर व्यक्तींनी विश्वस्त म्हणून काम पाहिले. सध्या मानसिंह पवार हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
लोकसहभागातून १९९३ मध्ये जीर्णोद्धार
१९९३ मध्ये लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. आज या ठिकाणी ५ फुटांहून अधिक उंचीच्या सुबक संगमरवरी मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या श्रीराम पंचायतन मूर्ती आहेत.