जळकोट तालुका झाला टँकरमुक्त
By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-26T00:16:39+5:302014-05-26T00:25:27+5:30
जळकोट : जळकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रातही वाढ झाली आहे.

जळकोट तालुका झाला टँकरमुक्त
जळकोट : जळकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रातही वाढ झाली आहे. विहिरी व तलावातील पाण्याची पातळीही कायम राहिल्यामुळे तालुक्यातील ४७ गावांपैकी येवरी, उमरदरा वगळता सर्व गावांतील पाणीप्रश्न मार्गी लागल्याने जळकोट तालुका टँकरमुक्त झाला आहे. जळकोट हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र निसर्गाच्या कृपेने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, जमिनीअंतर्गत पाण्याची पातळी वाढल्यामुळे मे अखेरपर्यंत पाणीपातळी टिकून राहील, एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळा संपत आला तरी प्रशासकीय अधिकारी जळकोट तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत निश्चिंत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांच्या दृष्टीने वरदान ठरणार्या तिरु नदीवरील १६ कि.मी. अंतरावरील पाच बॅरेजेस तयार झाल्यास याचा फायदा शेतकर्यांना होणार असून, या माध्यमातून तालुक्यातील हजारो हेक्टर्स जमिनी ओलिताखाली येऊन शेतकर्यांच्या जीवनात हरितक्रांती निर्माण होणार आहे. तालुक्यातील अनेक वाडी-तांड्यांवर पाणी योजना उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना आजही चलमे यांच्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याचीही प्रशासनाने दखल घेऊन पर्यायी व्यवस्था केली आहे. (वार्ताहर) याबाबत जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्याशी संपर्क केला असता तालुक्यात फक्त येवरी गावात पाणीटंचाई असल्याचे नागरिकांनी कळविले असून, येथील विहीर अधिग्रहण करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे.