आग्रहाचे निमंत्रण अन् ‘आशीर्वाद’ अडकले पेट्रोलपंपावर !
By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-26T00:13:58+5:302014-05-26T00:25:16+5:30
वलांडी : सद्य:स्थितीला लग्नसराईची धामधूम असून लग्न समारंभासाठी नातेवाईक व ईष्टमित्रांना वधू-वर पक्षाकडून आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते.

आग्रहाचे निमंत्रण अन् ‘आशीर्वाद’ अडकले पेट्रोलपंपावर !
वलांडी : सद्य:स्थितीला लग्नसराईची धामधूम असून लग्न समारंभासाठी नातेवाईक व ईष्टमित्रांना वधू-वर पक्षाकडून आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते. लग्नाची वेळ साधून निघालेल्या पाहुणेमंडळीच्या वाहनात इंधनच उपलब्ध न झाल्याने अनेक वाहने वलांडीच्या पेट्रोलपंपावर थांबल्याने लग्नाच्या शुभमुहूर्तावर वधू-वरास देणारे आशीर्वाद पेट्रोलपंपावरच अडकले अन् पाहुणे मंडळींत नाराजी पसरली. बाजारपेठेच्या बाबतीत वलांडीचा नावलौकिक असून, सीमा भागातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्या धर्तीवर वलांडी येथे पेट्रोलपंपाची सुरुवात झाली असली, तरी या पंपावर नेहमीच अडथळे निर्माण होतात. कधी इंधन नसते, तर कधी मशीन बंद राहते. यामुळे नेहमीच वाहनधारकांची अडचण होत असते. यावरून पंप असून अडचण, अशी परिस्थिती आहे. शेतकर्यांना सवलतीत इंधन मिळावे, या उद्देशाने येथील पंपाला मान्यता देण्यात आली असली, तरी शेतकर्यांनाही सुविधा वेळेवर मिळत नाहीत. शिवाय, पेट्रोल चालकाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. आजमितीला लग्नाच्या तिथी जास्त असल्याने सकाळपासूनच मोटारसायकलपासून ते मोठ्या वाहनांची रीघ लागली होती. विवाह कार्यासाठी निघालेल्या पाहुण्यांच्या गाडीत इंधनच उपलब्ध न झाल्याने अनेकांची गोची झाली. (वार्ताहर) इंधनपुरवठा सुरळीत करण्याची मागणी... पेट्रोलपंपावर मशीन खराब झाल्यामुळे ‘पेट्रोल नाही’ असा फलक वाचून वाहनधारकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावरून पंपाची उभारणी ही सोयीसाठी की गैरसोयीसाठी, महत्वाच्या वेळी इंधन उपलब्ध न होणे ही गंभीर बाब असून, या पंपाकडे जातीने लक्ष देवून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.