विजेअभावी उद्योग ठप्प; उत्पादनात २५ टक्क्यांची घट, कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:09 IST2025-06-14T20:06:25+5:302025-06-14T20:09:44+5:30
उद्योजकांचा महावितरणविरुद्ध संताप

विजेअभावी उद्योग ठप्प; उत्पादनात २५ टक्क्यांची घट, कोट्यवधींचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. विजेअभावी दुसऱ्या पाळीतील कामगारांना हातावर हात ठेवून बसावे लागले, तर तिसऱ्या पाळीतील उत्पादन पूर्णतः ठप्प झाले. यामुळे सुमारे २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. दरम्यान, हे नुकसान कसे भरून काढायचे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. एवढेच नव्हे तर दर शुक्रवारी दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. असे असताना पावसाच्या सरी कोसळताच वीजपुरवठा खंडित होतो, हा अनुभव शहरवासीय आणि उद्योगजगत घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी पावसात वीज यंत्रणा कोलमडून पडली. चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्येही रोज किमान ४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात आता नवीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम येथील उद्योगनगरी करीत आहे. मात्र, महावितरणचा कारभार त्या दर्जाचा नाही, या शब्दात पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, तर ‘मसिआ’चे माजी अध्यक्ष चेतन राऊत यांनी पाऊस अथवा वादळ येताच वीज खंडित होते. त्यामुळे वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, असे सांगितले.
वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू
मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे महावितरणने न केल्यामुळे गुरुवारी वाळूज येथे वीजपुरवठा खंडित झाला. आमच्या दुसऱ्या शिफ्टला कामावर आलेल्या कामगारांना बसून राहावे लागते, तर तिसऱ्या शिफ्टचे काम करताच आले नाही. एमआयडीसीतील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला. यात उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.
- अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.
वेळेत ऑर्डर देता येत नाही
महावितरणच्या गलथान कारभारामुळे उद्योग जगताला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे हा उद्योजकांचा हक्क आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे न झाल्याने अनेक झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्या. वीज नसल्याने ग्राहकांकडे ऑर्डर वेळेत पोहोचवता येत नाही.
-- दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष, सीएमआयए.