ताटातील अन्नपदार्थ चुकले की, कॅन्सर घरात; कोणत्या पदार्थांमुळे कॅन्सरचा किती धोका?

By संतोष हिरेमठ | Updated: June 7, 2025 11:42 IST2025-06-07T11:40:15+5:302025-06-07T11:42:56+5:30

जागतिक अन्नसुरक्षा दिन विशेष: शरीरासाठी भारतीय आहाराच ‘भारी’, थाळीतील अन्नपदार्थांची निवड आता शहाणपणाने करावी लागेल; शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहाराची ‘गुरुकिल्ली’

If the food on the plate is wrong, cancer will come to the house; What foods pose the risk of cancer? | ताटातील अन्नपदार्थ चुकले की, कॅन्सर घरात; कोणत्या पदार्थांमुळे कॅन्सरचा किती धोका?

ताटातील अन्नपदार्थ चुकले की, कॅन्सर घरात; कोणत्या पदार्थांमुळे कॅन्सरचा किती धोका?

छत्रपती संभाजीनगर : फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, स्मोक्ड मीट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाने भरलेली थाळी दिसायला आकर्षक वाटत असली, तरी तिचे परिणाम गंभीर ठरत आहेत. पाश्चात्त्य आणि चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा (कॅन्सर) धोका वाढतोय. हे पदार्थ ओठांपासून पोटांपर्यंतच्या कॅन्सरचा धोका निर्माण करत आहेत. याउलट पारंपरिक भारतीय आहार म्हणजेच बाजरी, नाचणी, डाळी, फळ, पालेभाज्यांवर आधारित आहार शरीराला संरक्षण देतो. त्यामुळे आरोग्य टिकवायचे असेल आणि कॅन्सरला दूर ठेवायचे असेल तर आपल्या थाळीतील अन्नपदार्थांची निवड आता शहाणपणाने करावी लागेल, असे म्हणत शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी आहाराची ‘गुरुकिल्ली’ दिली.

जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त डाॅ. अरविंद गायकवाड यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय विभागाशी संवाद साधला. यावेळी कॅन्सरचे वाढते प्रमाण आणि आहार यावर त्यांनी प्रकाश टाकला. कॅन्सर आणि आहाराचा जवळचा संबंध आहे. शरीरात सेल्स असतात आणि या सेल्सची निर्मिती होते. या सेल्स नष्ट होऊन नव्या सेल्स तयार होतात. कॅन्सरमध्ये सेल्सवाढीवर नियंत्रण राहात नाही. ते एखाद्या गाठीच्या स्वरूपात दिसते. ही गाठ साधीही असू शकते. परंतु, लवकर तपासणी करणे, बायोप्सी करणे महत्त्वपूर्ण ठरते. लवकर निदान आणि उपचाराने कॅन्सरवर मात करणे शक्य झाले असल्याचे डाॅ. गायकवाड म्हणाले.

योग्य आहार, अन्नपदार्थ केवळ शरीर पोसत नाही, तर आजारांपासून सुरक्षाही देते. मात्र, चुकीचे अन्नपदार्थ सतत सेवन केल्याने शरीरात दीर्घकाळ राहणारे घातक बदल घडवू शकते. विशेषतः कॅन्सरसारख्या आजारांचा उगम अनेकदा आपल्या ताटातूनच होतो, असे डाॅ. गायकवाड म्हणाले.

..अशी असावी जेवणाची थाळी
- फळे - १५० ग्रॅम
- भाज्या - ३५० ग्रॅम
- तृणधान्ये - २४० ग्रॅम
- डाळी, अंडी, मासे - ९० ग्रॅम
- सुकामेवा - ३० ग्रॅम
- तेल व मेद पदार्थ - २७ ग्रॅम
- दूध किंवा ताक/दही - ३०० मि.लि.

२००० किलो कॅलरीजसाठी संतुलित आहाराचा फूड पिरॅमिड
- पायथ्याचा स्तर : भाज्या ४०० ग्रॅम, फळे १०० ग्रॅम.
- दुसरा स्तर : तृणधान्ये आणि पौष्टिक पदार्थ २५० ग्रॅम.
- तिसरा स्तर : दूध/दही ३०० मि.लि., डाळी - ८५ ग्रॅम.
- सर्वात वरचा स्तर : सुकामेवा/बिया ३५ ग्रॅम, तेल व मेद पदार्थ २७ ग्रॅम.

कोणत्या पदार्थांमुळे, सवयींमुळे कॅन्सरचा किती धोका?
पदार्थ व सवयी - धोका

- रेड मीट व प्रक्रिया केलेले मीट : मोठ्या आतडे, गुदाशयाचा कर्करोग होण्याचा १.२ पट अधिक धोका.
- कमी फायबरयुक्त आहार (फळे व भाज्यांची कमतरता) : मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा १.१ पट अधिक धोका.
- जास्त मीठ असलेले अन्नपदार्थ (लोणचं, चटपटीत स्नॅक्स) : जठराचा कर्करोग होण्याचा १.५ पट अधिक धोका.
- जास्त चरबीयुक्त पदार्थ (तळलेले स्नॅक्स, बटरयुक्त अन्नपदार्थ) : ब्रेस्ट कॅन्सरचा १.१ पट धोका.
- अयोग्य आहारातून स्थूलपणा : गर्भाशय, मोठ्या आतड्यांचा व अन्ननलिकेचा कॅन्सरचा १.५ ते १.८ पट धोका.
- फळे व भाज्यांची आहारात कमतरता : तोंड, घसा, फुप्फुस, जठराचा कॅन्सरचा २ पट धोका.
- नियमितपणे मद्यपान : तोंड, यकृत, ब्रेस्ट, मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा २ पट धोका.
- अति-प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ (इन्स्टंट नूडल्स, चिप्स): मोठ्या आतडे, ब्रेस्ट, स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा १.२ ते १.३ पट धोका.
- कृत्रिम व साखरयुक्त शीतपेये : मोठ्या आतडे व गर्भाशयाच्या कॅन्सरचा १.२ पट धोका.
- चुकीची जैवनशैली, अयोग्य आहारामुळे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता : ब्रेस्ट, मोठ्या आतडे, प्रोस्टेट कॅन्सरचा १.३ पट धोका.

पारंपरिक भारतीय आहार
- ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यासारखी धान्ये.
- फायबरयुक्त आणि पोषक : भाज्या, फळे आणि डाळी यांचा समावेश.
- प्रक्रिया न केलेले पदार्थ, साखरेचे प्रमाण मर्यादित.
- बहुतांश वनस्पतीजन्य आहार, कधीकधी मांसाहार.

घरी उगवा भाजीपाला, विक्रेता परिचयाचा असावा
भालेभाजा, फळे रासायनिक पद्धतीने पिकवण्याचे प्रमाण वाढले आहे. असे भालेभाजा, फळे सतत सेवन केल्यानेही कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे शक्य झाले, तर रोजचा भाजीपाला घरी उगवला पाहिजे. अगदी शहरातही हे सहज शक्य आहे. भालेभाजा, फळे खरेदी करताना परिचयातील विक्रेता असावा. रासायनिक पद्धतीने पिकवलेले तर नाही, याची खात्री करावी, असा सल्ला डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिला.

भारतातील कॅन्सरचा ट्रेंड
क्रमांक- पुरुष - महिला - एकूण ट्रेंड

१- ओठ, तोंडाचा कॅन्सर - ब्रेस्ट कॅन्सर - ब्रेस्ट कॅन्सर
२- फुप्फुसाचा कॅन्सर - गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर - ओठ व तोंडाचा कॅन्सर
३- जठराचा कर्करोग - अंडाशयाचा कॅन्सर - गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
४- मोठ्या आतड्याचा कर्करोग - ओठ व तोंड - फुप्फुसाचा कॅन्सर
५- अन्ननलिका कॅन्सर - मोठ्या आतड्याचा कर्करोग - मोठ्या आतड्याचा कॅन्सर

Web Title: If the food on the plate is wrong, cancer will come to the house; What foods pose the risk of cancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.