कांद्याचे बियाणे अर्ध्या लाखावर
By Admin | Updated: May 24, 2014 02:09 IST2014-05-24T01:52:58+5:302014-05-24T02:09:59+5:30
दत्तात्रय पवार, करंजखेड गेल्या मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचा सफाया झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना गारपिटीतून वाचलेल्या बियाणाच्या कांद्याने मोठा दिलासा दिला आहे.

कांद्याचे बियाणे अर्ध्या लाखावर
दत्तात्रय पवार, करंजखेड गेल्या मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचा सफाया झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना गारपिटीतून वाचलेल्या बियाणाच्या कांद्याने मोठा दिलासा दिला आहे. आजघडीला बियाणाच्या कांद्याला ५० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी खरिपाची तयारी उत्साहाने करीत आहेत. ग्रामीण भागात ‘काळे सोने’ म्हणून ओळखल्या जाणार्या या पिकाला प्रथमच एवढा भाव मिळाला आहे. गतवर्षी १० ते १५ हजाराचा भाव होता, तो यंदा चार पटीने वाढला आहे. कन्नड तालुक्यातील करंजखेड, नागापूर, मेव्हूण, उंबरखेड, तांडा, पुरणवाडी, रामपूरवाडी, धामणी परिसरातील शेतकरी दरवर्षी जवळपास ५० टक्के क्षेत्रात बियाणाच्या कांद्याची लागवड करतात. नैसर्गिक आपत्ती आली नाही तर उत्पन्नही चांगले येते. यंदाही कांदा बहरात होता; परंतु मार्च महिन्यात गारपीट झाली. अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून जो कांदा वाचला, त्याला शेतकर्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपले. त्यामुळे आज त्यांच्या कष्टाचे सोने झाले. कांदा बियाणे निघण्यास सुरुवात झाली असून उतारा कमी आल्यामुळे भाव तेजीत आला आहे. प्रतिक्विंटल ५० हजाराचा भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत. सिल्लोड, बोरगावचे व्यापारी या भागात येऊन हा कांदा खरेदी करीत आहेत. करंजखेड येथील शेतकरी कौतिकराव सखाराम जाधव (६०) यांनी सांगितले की, माझ्याकडे १५ एकर शेती असून एका एकरात मी बियाणाच्या कांद्याची लागवड केली होती. ५ क्विंटल उत्पादन येईल, अशी आशा होती; परंतु गारपिटीने फक्त दोन क्विंटलच उत्पादन झाले; परंतु भाव मोठा मिळाल्याने मी आनंदी आहे. तालुक्यातील उंबरखेड, रामपूरवाडी व तांड्यावरील पिकांना गारपिटीची झळ न पोहोचल्याने याठिकाणी १०० टक्के पीक आले आहे. एका-एका गावात ८ ते १० कोटींची उलाढाल या काळ्या सोन्यामुळे होत आहे. यंदा भाव चांगला मिळाल्याने शेतकरी पुन्हा याच पिकाकडे वळणार आहे, एवढे मात्र खरे!