Gram Panchayat Voting : औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ गावकारभाऱ्यांसाठी मतदानाला सुरुवात; चार तासात केवळ १५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:13 IST2021-01-15T13:06:09+5:302021-01-15T13:13:10+5:30
gram panchayat पदयात्रांसह सोशल मीडियातून हायटेक प्रचार निवडणुकीत राबविला गेला.

Gram Panchayat Voting : औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ गावकारभाऱ्यांसाठी मतदानाला सुरुवात; चार तासात केवळ १५ टक्के मतदान
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. मतदानासाठी महसूल आणि पोलीस, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शांततेत मतदान होण्यासाठी सर्वांचा कस लागणार आहे. दरम्यान सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात १०. ८ टक्के तर त्यानंतर १२.३० वाजेपर्यंत केवळ १५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक मतदान सिल्लोड तालुक्यात १५ टक्के झाले आहे.
५ जानेवारीपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता झाल्यानंतर गुरुवारी, १४ जानेवारी रोजी उमेदवारांनी गुप्त बैठकांवर भर देत मतदानासाठी रणनीती आखली. प्रचार, पदयात्रांसह सोशल मीडियातून हायटेक प्रचार निवडणुकीत राबविला गेला. सुमारे १५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी घेतली आहे दक्षता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, बीडीओ आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी स्क्रीनिंग करणार आहेत. सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर, थर्मलगनचा वापरही पथक करणार आहे.
१८ जानेवारीला निकाल
तहसीलदार पातळीवर ग्रामपंचायत निवडणूक, मतमोजणी आणि निकालाची तयारी करण्यात आली आहे. नऊ तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
कुणाचीही गय केली जाणार नाही.
पोलीस बंदोबस्त कडक असणार आहे. कुणीही मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास तातडीने अटक करून गुन्हा दाखल केला जाईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.
निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती अशी
उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले की, तालुका पातळीवरून निवडणुकांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन होत असून, पूर्ण तयारी झाली आहे. प्रशासन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल या दिशेने सज्ज झाले आहे.
निवडणुकीबाबत दृष्टिक्षेप :
- जिल्ह्यातील ग्रामपंचायती - ६१७
वैजापूर - १०५, सिल्लोड - ८३, कन्नड - ८३, पैठण - ८०, औरंगाबाद - ७७, गंगापूर - ७१, फुलंब्री - ५३, सोयंगाव - ४०, खुलताबादध्ये - २५
- प्रभाग- २०९०
- एकूण उमेदवार- ११ हजार ४९९
- महिला उमेदवार- ६ हजार
- संवदेनशील गावे - निश्चित आकडा नाही
- बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - ३५
- बिनविरोध प्रभाग - १८३
- बिनविरोध उमेदवार - ६१०
- क्षेत्रीय अधिकारी - ११३
- कर्मचारी - २५००
पहिल्या दोन तासातील टक्केवारी : ११ टक्के
तालुका ग्रामपंचायत संख्या मतदान केंद्र टक्केवारी
औरंगाबाद 71 316 8.16
पैठण 78 321 9.3
फुलंब्री 49 171 13.21
सिल्लोड 77 336 15.45
सोयगाव 36 114 14.04
कन्नड 80 312 7.5
खुलताबाद 25 79 12.25
वैजापुर 96 315 10.71
गंगापुर 67 284 10.23
एकुण 579 2261 10.81