पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 19:04 IST2026-04-10T19:03:37+5:302026-04-10T19:04:54+5:30
मोदींशी असलेल्या संबंधांवर तोगडियांनी प्रथमच केलं जाहीर भाष्य.

पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया
छत्रपती संभाजीनगर: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी शहरात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठे विधान केले. "अयोध्येत श्रीराम मंदिर उभारल्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे पुन्हा मनोमिलन झाले आहे. राममंदिर हाच आमच्यातील मतभेदाचा मुख्य मुद्दा होता, जो आता मिटला आहे. आता आम्ही चौघे मिळून काशी आणि मथुरा येथील प्रश्नही मार्गी लावू," असा विश्वास तोगडिया यांनी व्यक्त केला.
समृद्ध हिंदू अभियानाचा शुभारंभ
डॉ. तोगडिया हे 'समृद्ध हिंदू अभियाना'निमित्त शहरात आले होते. या अभियानांतर्गत हिंदूंना आरोग्य सुविधा, डॉक्टरांकडून मोफत उपचार, हिंदू हेल्पलाइन आणि युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ मंदिरच नाही, तर हिंदू समाज आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सक्षम व्हावा, ही या अभियानाची मूळ संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
गेल्या काही वर्षांपासून तोगडिया हे मोदी सरकारचे प्रखर टीकाकार म्हणून ओळखले जात होते. मात्र, संभाजीनगरमधील त्यांच्या या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपमधील जवळीक पुन्हा वाढल्याचे संकेत मिळत आहेत. या पत्रकार परिषदेवेळी जे. के. जाधव, सुभाषसेठ मोकरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तोगडिया यांनी उल्लेख केलेले 'चौघे' नेमके कोण, याबाबत मात्र राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.