- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रत्येक लहान गावातही लग्न रखडलेले किमान ५० शेतकरी तरुण आहेत. अनेक ठिकाणी लग्नासाठी ‘विकत’ मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच शेतकऱ्यांना लग्नाच्या नावाने लाखोंचा गंडा घातला जात आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपबिती सांगितली. लग्नाळू शेतकरी तरुणांचे विवाह आणि त्यातून निर्माण झालेल्या दलालीच्या या बाजारात नात्यांचा आधार प्रेम नव्हे, तर फक्त पैसा आहे.
काही तरुणांनी समाजाच्या दबावाखाली आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर दलालांमार्फत मुली आणून लग्न केले. पण, काही महिन्यांतच वधूने पोबारा केल्याच्याही घटना घडल्या. नोकरी करणाऱ्यांना लग्नाच्या बाजारात अधिक भाव आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करून मुलगी मिळत नसल्याने अनेक जण दलालांच्या या जाळ्यात सहज फसत आहेत. अनेक दलाल बिहार, झारखंड, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतून मुलींना पैसे देऊन आणतात. लग्न ठरवण्यासाठी ३ ते १० लाखांपर्यंत रक्कम घेतात. बनावट कागदपत्रे वापरून लग्न होते आणि काही दिवसांत नवरी आणि एजंटही गायब होतात. या व्यवहारात कोणताही पुरावा नसल्याने तक्रार करतानाही अडचणी येतात.
केस १ -३० वर्षीय बबलूला (नाव बदलले आहे.) शेतीमुळे गावातच काय, दूर-दूरही मुलगी मिळत नव्हती. त्यांना धुळ्यातील एकाने स्थळ दाखवले. त्या बदल्यात २ लाख देण्यात आले. पुढे यात शामराव आणि दीपिका या व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रमात लग्नासाठी खूप मुली असल्याचे सांगत त्यांच्याकडून ३ लाख उकळले. मात्र, पुन्हा त्या दोघांचा फोन कधीच लागला नाही. नंतर एका वेगळ्या दलालामार्फत त्यांनी २ लाख देऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलीशी लग्न केले. मात्र ७-८ महिन्यांतच या मुलीनेही सुंबाल्या केला.
केस २-२८ वर्षीय अनिल (नाव बदलले आहे.) याने लग्नासाठी मध्यस्थामार्फत पावरी समाजातील मुलगी निवडली. अडीच लाखांमध्ये सौदा झाला. मुलीच्या गावातील एका जंगलात असलेल्या महादेव मंदिरात साध्या पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर पहिल्यांदा मुलीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. पतीही तिच्यासोबत गेला, मात्र रस्त्यातच पतीला चकवा देत मुलगी निसटली. त्यानंतर ते कुटुंब पुन्हा कधीही त्यांना त्या गावात दिसले नाही.
पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुली द्याव्यातशेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून मुली नोकरदारांची निवड करत आहेत. पुढाऱ्यांनी आपल्या मुली शेतकऱ्यांना द्याव्यात. म्हणजे, समाजात चांगला पायंडा पडेल. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही खात्री करूनच मुलीची निवड करावी.- विजय काकडे, मुख्य समन्वयक, भारत क्रांती मिशन